Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedमूकनायक’ महानाट्याच्या माध्यमातून प्रेक्षकांनी अनुभवला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचा इतिहास

मूकनायक’ महानाट्याच्या माध्यमातून प्रेक्षकांनी अनुभवला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचा इतिहास

पिंपरी, दि.१६ एप्रिल २०२४ :- महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘मूकनायक’ या महानाट्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनात केलेल्या विविध महान कार्यांच्या प्रसंगांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. देशाच्या विकासात महत्वपुर्ण ठरलेल्या पायाभूत सुविधांची निर्मिती करताना शेती व उद्योग विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुरदृष्टीतून महानदीवर हीराकुंड प्रकल्प, सिंधु आणि सतलज नदीवर भाखडा नांगल प्रकल्प, दामोदर नदीवर दामोदार प्रकल्प असे बहुउद्देशीय प्रकल्प उभारण्यात आल्याचा इतिहास महानाट्याच्या माध्यमातून दाखविण्यात आला. या महानाट्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांचा त्यागपूर्ण संघर्षमय जीवनप्रवास डोळ्यांसमोर उभा राहिला आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यात सोसलेल्या हालपेष्टांचे प्रसंग पाहून उपस्थित प्रेक्षक भावूक झाले.

 

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टी स्मारकाशेजारील मैदानात महानगरपालिकेच्या वतीने दि. ११ ते १५ एप्रिल २०२४ दरम्यान पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या विचार प्रबोधन पर्वाच्या पाचव्या दिवशी अंतिम सत्रात पिंपरी येथील एच ए मैदानावर सायंकाळी जतीन पाटील दिग्दर्शित मूकनायक या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या महानाट्याच्या अप्रतिम सादरीकरणामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काळ अनुभवता आला, अशा प्रतिक्रिया उपस्थित प्रेक्षकांनी दिल्या.

 

विचार प्रबोधन पर्वाचे मुख्य संयोजक तथा अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी तथा विचार प्रबोधन पर्वाचे संयोजक डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता विनय ओहोळ, राजेंद्र साळवे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, उपअभियंता विजय कांबळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. ‘मूकनायक’ महानाट्य पाहण्यासाठी नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात विविध क्षेत्रात केलेल्या महान कार्यांचे ठराविक प्रसंग या महानाट्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा हा नागरी हक्कांसाठी होता. त्यांनी समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच देशाच्या विकासात भरीव योगदान दिले. महिलांच्या हक्कांसाठी हिंदू कोड बील, प्रसूती काळातील रजा, कामगारांना साप्ताहिक सुट्टी, अल्पसंख्यांक, इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती जमातींसाठी संविधानात केलेली तरतूद असे महत्वपुर्ण प्रसंग या महानाट्याच्या माध्यमातून दाखविण्यात आले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही किती समर्पक आहेत हे ‘मूकनायक’ एका नायकाची कथा सांगते, ज्यांनी या समाजात अस्पृश्यता आणि विषमता यांसारख्या दुष्कृत्यांना सहन न करता त्यांच्याविरोधात आवाज उठविला. न थांबता, खचून न जाता सर्वांना सोबत घेऊन समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले. एक काळ असा होता जेव्हा समाज अस्पृश्यता आणि विषमता यांसारख्या रोगांनी ग्रासलेला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला या रोगांपासून बरे केले. समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या याच विचारांवर आधारित या महानाट्याने प्रेक्षकांना भारावून टाकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकशाही मूल्यांसाठी लढत होते आणि केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांना सन्मान मिळत होता. त्यांच्या याच महान कार्याचा प्रवास या महानाट्याच्या माध्यमातून प्रेक्षकांनी यावेळी अनुभवला आणि विचार प्रबोधन पर्वाचा शेवटचा दिवस संपन्न झाला.

 

दरम्यान, विचार प्रबोधन पर्वाच्या शेवटच्या दिवसाची सुरूवात स्थानिक कलाकारांच्या महामानवांच्या विचारांचा संगीतमय जागर हा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी सुमेध कल्हाळीकर यांच्या महापुरुषांच्या परिवर्तनवादी गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात अनिरुद्ध सूर्यवंशी, वैशाली नगराळे, सुनील गायकवाड यांचा सहभाग होता. त्यानंतर आंबेडकरी गीतांची प्रबोधनात्मक मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफिलमध्ये रोमिओ कांबळे, मुन्ना भालेराव, सागर येल्लाळे, संगीता भंडारे या कलाकारांचा सहभाग होता. या कार्यक्रमानंतर वारभुवन, मारूती जकाते, सुमन चोपडे, सत्यभामा मस्के यांच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी गायक विशाल ओव्हाळ, धीरज वानखेडे, छाया कोकाटे, मिलिंद शिंदे यांचा महामानवांच्या जीवनावर आधारित प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments