पुणे : आज अयोध्येत जे होत आहे ते पेशव्यांचे स्वप्न होते, पेशव्यांच्या कागदोपत्री अनेकदा हा उल्लेख सापडतो, कि शिवाजी महाराज यांची अशी इच्छा आहे, उत्तरेतील तीर्थस्थाने मुक्त करावीत. त्यावेळी नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे, सवाई माधवराव, महादजी शिंदे या सगळ्यांनी उत्तरेमध्ये जाऊन तीर्थस्थाने मुक्त करण्याचे काम केले होते. या सगळ्याचा इतिहास सांगणारा शनिवार वाडा ही केवळ वास्तू नाही, तर २५० वर्षांचा इतिहास सांगणारा जिवंत शाहीर आहे. असे मत इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी व्यक्त केले.
थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवार वाड्याचा २९२ वा वर्धापन दिन शनिवार वाड्याच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुष्करसिंहजी पेशवा, निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले, कुंदनकुमार साठे, श्रीकांत नगरकर, जगन्नाथ लडकत, चिंतामणी क्षीरसागर, मोरेश्वर गांगल, रवींद्र कुलकर्णी, उमेश देशमुख, विश्वनाथ भालेराव यावेळी उपस्थित होते.
मोहन शेटे म्हणाले, भारत हजारो वर्षे धर्मभूमी, ज्ञानभूमी, संगीत, कला, साहित्य याने संपन्न भूमी होती. संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारी भूमी होती, परंतु अनेक आक्रमणामुळे ती पारतंत्र्यात गेली. देशातील अनेक पराक्रमी योद्धांनी आपले बलिदान देऊन भारत भूमीला पारतंत्र्यातून मुक्त केले.
भूषण गोखले म्हणाले, एनडीएमध्ये बाजीराव पेशवे यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. येणाऱ्या कॅडेटना यामुळे स्फूर्ती मिळेल. अयोध्येमध्ये देखील प्रभू श्रीराम यांचे आगमन झाले आहे. शनिवार वाडा आणि श्रीराम यांच्याकडून आजच्या दिवशी प्रेरणा घेऊया, असेही त्यांनी सांगितले.


