*पुणे, दि. १३ फेब्रुवारी*
भारतीय संविधान या विषयावर जनजागृती व्हावी आणि जिज्ञासूंना संविधानाबाबत समग्र माहिती मिळावी, या उद्देशाने ‘भारतीय संविधान सद्य आणि भविष्यातील दृष्टिकोन’ या विषयावरील परिषदेचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालयाचे ॲम्फी थिएटर येथे करण्यात आले आहे.
प्रबोधन मंच, पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे श्री. नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय यांनी संयुक्तरीत्या या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय परिषदेचे उदघाटन शुक्रवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता बिहारचे राज्यपाल आरीफ मोहम्मद खान यांच्या हस्ते होणार असून त्यांच्या भाषणाने परिषदेचा प्रारंभ होईल. त्यानंतरच्या सत्रात दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू श्रीमती शांतीश्री पंडित यांचे व्याख्यान होईल. परिषदेचा समारोप शनिवारी दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी करणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ‘भारतीय संविधान बदलण्यात येणार,’ असा मुद्दा प्रचारामध्ये मांडण्यात आला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाबद्दल जनमानसात जिज्ञासा असून या विषयी अधिक जनजागृती होण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरीभाऊ मिरासदार यांनी दिली. ही परिषद सर्वांसाठी खुली असल्याचे मंचाचे सहसंयोजक अजय महाजन यांनी सांगितले.
—-


