पुणे : पाश्चिमात्य देशात जन्मभूमीला फादर लॅंड असे संबोधतात.आपण मात्र मातृभूमी म्हणतो. मातृ देवो भव ही आपली परंपरा आहे. केवळ आपलेच राष्ट्र असे हे आहे की ज्याने आपल्या भूमीला मातेची उपमा दिली आहे. आपल्या मातीशी आपली कायम निष्ठा राहिली पाहिजे. आपल्या पायाला लागलेल्या मातीचे विस्मरण होऊ देऊ नका तरच तुमचे हात आकाशाला लागले तरी पाय जमिनीला टेकलेले असतील. असे मत ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटी पुणेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे मानद सचिव अण्णा थोरात, मानद सहसचिव विकास गोगावले, जगदीश जेधे, कमलताई व्यवहारे, प्रभारी प्राचार्य डॉ. दिपाली पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आप्पासाहेब जेधे महाविद्यालय, श्री शिवाजी मराठा हायस्कूल, जिजामाता हायस्कूल, सीताराम विद्यालयचे विद्यार्थी, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
राहुल सोलापूरकर म्हणाले, अनेक जण देशाबद्दल हेटाळणी करणारे वक्तव्य करतात. आपण आपल्या देशाला नीट ओळखले नाही. आपल्या देशाचा इतिहास गौरवशाली आहे, पुढील भविष्य देखील असेल. आपली इतिहासातील परंपरा पुढे नेण्यासाठी देशातील नागरीक म्हणून विद्यार्थी काम करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्राचार्या डॉ. दिपाली पाटील यांनी प्रास्ताविक केले. दिलीप काकडे यांनी आभार मानले.


