पुणे (पिंपरी चिंचवड) दिंनाक १२ जुलै २०२५ ः समाजामध्ये ईश्वर बघण्याची दृष्टी गिरीश प्रभुणे यांच्यात विकसित झाली. त्यांनी ईश्वर म्हणूनच समाजाची भक्ती केली. ज्या भक्तीचे साधन कर्मशिलता होते. अशा कर्ममार्गावर वाटचाल करणाऱ्या व्यक्तीत्वाचे नाव म्हणजे गिरीश प्रभुणे होय, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी काढले.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, पद्मश्री रमेश पतंगे, आयुक्त शेखर सिंह, प्रांत संघचालक प्रा. नाना जाधव उपस्थित होते.
समाजातील वंचित घटक आणि भटक्या विमुक्तांसाठी गिरीश प्रभुणे यांनी ग्रामायण, यमगरवाडी प्रकल्प आणि पुनरूत्थान समरसता गुरूकुलम सुरू केले. गेली ५० वर्षे त्यांनी भटक्या विमुक्तांना शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. भैयाजी जोशी पुढे म्हणाले,”चाकोरीबद्ध जीवनाच्या पलीकडे जात गिरीशजींनी एक अंधारी आणि तेवढीच साहसी वाट चोखाळली. सत्कर्मांवर ज्यांचा विश्वास असतो त्यांनाच हे शक्य असते. समाजाच्या प्रश्नावर चर्चा करणारे आणि प्रबंध लिहिणाऱ्यांची कमी नाही. मात्र, त्यावर समाधान शोधत कार्य करण्याची प्रामाणिकता व हिंमत फार कमी लोकांकडे आहे. गिरीशरावांकडे ती आहे. त्यांनी यश अपयशाचे गणित न मांडता, नैराश्याला जवळ येऊ न देता ही साधना पूर्ण केली आहे.” शरीर, मन आणि बुद्धी बरोबरच आंतरिक शक्तींनी एखादे काम स्वीकारले तर ते अपरिवर्तनीय राहते. भटके विमुक्त आणि वंचितांच्या उत्थानासाठी गिरीशीजींनी सुरू केलेल्या या यज्ञात आपणही यथाशक्ती समिधा टाकावी, कार्यकर्त्यांनीही समाजकार्यासाठी साधनांची वाट न पाहता कार्यरत व्हावे असे आवाहन त्यांनी यांनी केले.
वंचित घटकातील मुलांना घडविण्याचे प्रभुणे काकांचे केलेले कार्य अतुलनिय आहे. ज्यामुळे पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असे मत खासदार बारणे आणि आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले. गिरीशजींबरोबर वहिनींनी घर सांभाळले, पूर्ण परिवारच या ध्येयवादामध्ये समाविष्ट झाल्याचे, यमगरवाडीचे समन्वयक महादेव गायकवाड यांनी सांगितले. गुरूकुलमच्या प्रधानाचार्य पूनम गुजर म्हणाल्या, समाजातील वंचित घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रभुणे काकांनी २००६ मध्ये पुनरुत्थान समरसता गुरुकुलमची स्थापना केली. भारताच्या पुनरुत्थानाची भूमिका असलेल्या या गुरुकुलात कौशल्याधारीत शिक्षण दिले जाते. यमगरवाडी प्रकल्पाच्या विद्यार्थिनी ललिता जाधव म्हणाल्या,”गिरीशजी आमच्यासाठी देवतुल्य आणि ऋषीतुल्य आहेत. माणूस म्हणून ज्यांना जगण्याची परवानगी नव्हती अशा विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण दिले. यमगरवाडी प्रकल्पातून हजारो वंचितांसाठी तुम्ही कार्य केले. त्यामुळे पद्मश्री पुरस्कारही तुमच्यामुळे मोठा झाला आहे.असेही त्या म्हणाल्या.
डॉ. सुनिल भंडगे यांनी प्रास्ताविक केली. आभार प्रा. डॉ. संजय तांबट यांनी मानले.
—-
भटक्या विमुक्तांच्या कामातून संघ समजला ः
मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या माझ्या सारख्या कार्यकर्त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे भटक्या विमुक्तांची सेवा करता आली. यामध्ये दामुअण्णा दाते, मुकुंदराव पणशीकर, नाना नवले, रमेश पतंगे अशांची मोलाची साथ लाभली, खरं तर भटक्यांच्या कामामुळेच मला संघ उमगला. हे माझे कतृत्व नसून संघाचे आहे, असे प्रतिपादन गिरीश प्रभुणे यांनी केले. पारधी समाजासह भटक्यांतील इतरही जमातींचे उत्थान होत आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अजून दोन ते तीन पिढ्या कार्य करावे लागेल. असेही ते म्हणाले.


