गणेशोत्सवानिमित्त देश विदेशात,विविध ठिकाणी अनेक प्रेरणादायी कार्यक्रम झाले. असे कार्यक्रम पाहिले की,गणेशोत्सवाचे सार्थक झाल्याचे आपल्याला वाटू लागते.
असाच एक अविस्मरणीय अनुभव नवी मुंबईतील मिलेनियम टॉवर्स संकुलातील रहिवाश्यांना आला.देश प्रेमाने आणि चित्तथरारक,नाट्यमय प्रसंगांनी,प्रभावी अभिनयाने केवळ २ पात्रे असलेल्या
” मी भारतीय ” या दीर्घांकाने
उपस्थित सर्व प्रेक्षक भारावून गेलेत. काहीं संवेदनशील प्रेक्षकांना तर अश्रू अनावर झाले! आजच्या काळात,मने
कोरडी होत असताना,जाहीर ठिकाणी प्रेक्षकांच्या डोळ्यातून अश्रू येण्याची किमया “मी भारतीय” ने घडवली.
“मी भारतीय” हा फक्त एक दीर्घांक नाही तर दीर्घकाळ लक्षात राहणारा स्वातंत्र्य लढ्याच्या उजळणीचा प्रयत्न आहे.देशाला स्वातंत्र्य मिळाले पण त्यासाठी अनेक देशभक्तांनी हौतात्म्य पत्करले. अतोनात कष्ट करून आपले आयुष्य राष्ट्रासाठी अर्पण केले. पण त्यांच्या या त्यागाची जाण न ठेवता बऱ्याच व्यक्ती “स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार” असा ग्रह करून जगत असून त्यामुळे देश घडवण्याऐवजी बिघडवण्याचेच काम होत आहे. असे होऊ नये,आजची,उद्याची पिढी देशभक्तीने भारली जावी, त्यांना देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले,ते आपण कसे जपले पाहिजे, स्वातंत्र्याचे सुराज्य कसे होईल ,एक जबाबदार,देशभक्त नागरिक
म्हणून आपली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याचे भान आणून देणारा हा प्रयोग आहे.
या प्रयोगापूर्वी मिलेनियम टॉवर्स हाउसिंग सोसायटी फेडरेशन च्या कार्यकारिणीचे सदस्य श्री श्रीकांत जोशी यांनी
दोन्ही कलाकारांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. कार्यक्रम झाल्यावर
साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष कुलकर्णी,
जेष्ठ पत्रकार,श्री अरुण करमरकर, फेडरेशन चे संस्थापक सदस्य श्री दत्तात्रय पिसाळ,युवा चित्रपट कलाकार ओझू बरुवा , सामाजिक कार्यकर्त्या
सौ मीरा कडबे, विद्यार्थिनी
कुमारी तन्वी भातखंडे, आदींनी यथोचित मनोगते व्यक्त केली.
देशभक्तीची चळवळ रुजावी हाच या कार्यक्रमाचा उद्देश असल्याने प्रयोगासाठी काहीही पैसे आकारण्यात येत नाहीत.आपण स्वेच्छेने आर्थिक सहयोग देऊ शकतो, तोही हे कार्यक्रम ठिकठिकाणी होण्यास मदत व्हावी, यासाठी.
दिवसेंदिवस प्रत्येक गोष्टीचे व्यापारीकरण होत असताना, उदात्त हेतूने प्रेरित होऊन
“मी भारतीय” चे प्रयोग करीत असल्याबद्दल लेखक श्री प्रदीप तुंगारे, संकल्पना, दिग्दर्शन आणि स्वतः एक कलाकार असलेले श्री रवींद्र देवधर,दुसरे कलाकार श्री ऋषिकेश कानडे या सर्वांचे
कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.
या निमित्ताने आपणही आपला देश सशक्त, समृद्ध, स्वच्छ होण्यासाठी अधिक प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करू या.
लेखन:देवेंद्र भुजबळ.
९८६९४८४८००
☎️9869484800


