Monday, August 31, 2026
Google search engine
HomeUncategorized३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

३१व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भव्य उद्घाटन

 

 

 

कला, संस्कृती, गायन, वादन, भजन, नृत्य, संगीत यांचा मनोहारी संगम असणारा पुणे नवरात्रौ महोत्सवाचे यंदा ३१वे वर्ष दिमाखात साजरे करीत असून, महोत्सवाचे उद्घाटन सोमवार, दि. २२ सेप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता महाराष्ट्राचे महसूलमंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल. याप्रसंगी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार ,राज्याच्या नागरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खा. मेधा कुलकर्णी, आ.डॉ. विश्वजीत कदम, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटनाचे खास आकर्षण

या उद्घाटन सोहळ्यात सिनेतारका भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, शितल अहिरराव, राधा सागर, सिया पाटील, ऋजुता जुन्नरकर, अमृता धोंगडे, वैष्णवी पाटील यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी असेल. या महोत्सवाचे सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असतात. अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

सोमवार दि. २२ सप्टेंबर घटस्थापनेच्या दिवशी शिवदर्शन येथील श्री. लक्ष्मीमाता मंदिरात आबा बागुल व सौ. जयश्री बागुल यांच्या हस्ते सकाळी ६.४१ मि. या शुभमुहूर्तावर विधिवत घटस्थापना केली जाईल. या मंदिरात यंदा माधुराई येथी ७२ फुट उंचीचे मीनाक्षी मंदिर हा भव्य देखावा साकारला जात असून दक्षिणेकडील सुमारे ८० कलावंत या देखाव्याचे काम करीत आहेत.

दरवर्षी दिले जाणारे महर्षी – लक्ष्मीमाता जीवनगौरव पुरस्कार

या उद्घाटन सोहळ्यात उतुंग कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तीस दरवर्षी ‘महर्षी पुरस्कार’ देऊन गौरवले जाते. यंदा भटक्या विमुक्त समाजातील मुलांचे संगोपन शिक्षण व संस्कार यासाठी अविरत काम करणारे समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना महर्षी पुरस्काराने सन्मानित केले जाईल. असे आबा बागुल यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तींना या उद्घाटन सोहळ्यात श्री. लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाच्या पुरस्कारचे मानकरी डॉ. पराग काळकर (प्र-कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सामजिक कार्यकर्त्या डॉ. मेघा पुरव सामंत, बुलढाणा सहकारी बँकेचे सहसंस्थापक शिरीष देशपांडे आणि लोककलावंत प्रमिला लोदगेकर यांना या पुरस्काराने गौरवले जाईल.

याशिवाय डॉ. मयूर कर्डिले आणि डॉ. अरविंद खोमणे, यांचेही विशेष सन्मानित करणात येणार आहेत.

भव्यदिव्य उद्घाटन सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम

उद्घाटन सोहळा दरवर्षी प्रमाणे भव्य आणि नेत्रदीपक असेल. यामध्ये सितार, व्हायोलिन, बासरी व तबला यांची जुगलबंदी असणारा ‘आनंद तरंग’ हा कार्यक्रम डॉ. नीलिमा राडकर आणि माधवी करंदीकर व ग्रुप सादर करतील. नृत्यगुरु पं. शमा भाटे व सहकारी ‘शरण्ये रुद्र चंडिके’ कथ्थक हा कार्यक्रम सादर करतील. विनोद धोकटे, स्वाती धोकटे व सहकलाकार ‘जागर शक्ती पिठांचा’ देवीचा गोंधळ हा कार्यक्रम सादर करतील. उद्घाटन सोहळ्याचा आकर्षण ठरणारा मराठी सिनेतारका भार्गवी चिरमुले, तेजा देवकर, सानिया चौधरी, शितल अहिरराव, राधा सागर, सिया पाटील, ऋजुता जुन्नरकर, अमृता धोंगडे, वैष्णवी पाटील या सिनेतारकांचा ‘जल्लोष’ हा नृत्याविष्कार रसिकांना मंत्रमुग्ध करेल. याचे नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांनी केले आहे.

महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम

उद्घाटना नंतर पुण्यातील एकमेव सलग ११ दिवस विजयादशमीपर्यंत रोज सायंकाळी ७ वाजता श्री. गणेश कला क्रीडा रंगमंच येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील.

मंगळवार दि. २३ रोजी १९९०च्या काळातील सुरेल गाण्यांचा ‘नाईनटीज मेलडी’ हा कार्यक्रम अभिजित सराफ, कल्याणी देशपांडे आणि अक्षय घाणेकर सादर करतील.

बुधवार दि. २४ रोजी ‘इश्क़ सुफियाना’ कार्यक्रम संदीप पंचवाटकर, प्रवीण अवचर, संदीप उबाळे आणि विनल देशमुख सादर करतील.

गुरुवार दि. २५ रोजी ‘स्वर साम्राज्ञीयाँ’ हा अवीट द्वंद्व गीतांचा कार्यक्रम राधिका अत्रे, राजेश्वरी पवार, कविता सेंगर आणि चारुलता पाटणकर सादर करतील.

शुक्रवार दि. २६ रोजी ‘मुझीकल मास्टर्स’ एल.पी अँड आर.डी.’ कार्यक्रम पल्लवी पत्की ढोले, संजय हिवराळे, रफी हबीब, विनोद नरवडे आणि भाग्यश्री डुंबरे सादर करतील.

शनिवार दि. २७ रोजी एकाच वेळी ५० कलाकारांसह ‘अस्मिता महाराष्ट्राची’ हा कार्यक्रम पृथ्वीराज नागवडे, अंकिता शिवतरे व सौगंध कापसे सादर करतील.

रविवार दि. २८ रोजी दुपारी १२ ते रात्री १२पर्यंत सलग १२ तास चालणारा महाराष्ट्राची लोककला जतन करणारा एकमेव भव्य महोत्सव असून महिलांसाठी आकर्षण ठरलेला ‘लावणी महोत्सव’ दरवर्षीप्रमाणे विशेष आकर्षण ठरेल. यामध्ये लावणी कलावंत सीमा पोटे, भाग्यश्री बारामतीकर, रक्षा पुणेकर, काव्या पुणेकर, रील स्टार कुकू, वर्षा मुंबईकर, सिनेअभिनेत्री अर्चना सावंत, ज्योती मुंबईकर, शलाका पुणेकर, सोनाली शिंदे सादर करतील.

सोमवार दि. २९ रोजी ‘टोटल म्युझिक धमाका’ मुकेश देढीया, तेजस्विनी पाहुजा, चंद्रशेखर महामुनी, माधुरी भोसेकर आणि आकाश सोलंकी सादर करतील.

मंगळवार दि. ३० रोजी ‘बेमिसाल रफी’ हा कार्यक्रम आली हुसेन, आनंद म्हसवडे आणि कल्याणी देशपांडे हे सदर करतील.

दि. १ ऑक्टोबर रोजी ‘हृदयात वाजे समथिंग’ हा रोमँटिक गाण्यांचा कार्यक्रम तन्वी दात्ये, ए सराफ, अवंतिका धुमणे आणि आर.जे बंड्या सादर करतील.

दि. २ ऑक्टोबर विजयादशमी दिवशी ‘सोलफुल किशोर कुमार’ हा बहारदार कार्यक्रम ज्येष्ठ गायक जितेंद्र भूरूक, रुपाली घोगरे व ग्रुप सादर करतील आणि सलग ११ दिवस चाललेल्या या संगीतमय आनंद सोहळ्याची सांगता होईल.

कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, उपाध्यक्ष घनशाम सावंत, सचिव नंदकुमार कोंढाळकर, सदस्य रमेश भंडारी, सदस्य अमित बागुल व सदस्य हेमंत बागुल हे उपस्थित होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments