पुणे – पर्वती मतदारसंघातील सर्व्हे नंबर ९२, शाहू वसाहत येथील नागरिकांनी अन्यायकारक पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या एसआरए प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शविला आहे. शाहू वसाहत बचाव नागरिक कृतीसमितीने केंद्रीय राज्यमंत्री व पुणेचे खासदार मा. मुरलीधर मोहोळ यांच्याकडे या प्रकल्पाची तात्काळ चौकशी करून रद्द करण्याची मागणी केली.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, येथील सर्व घरे पक्की असून एसआरएची काहीही गरज नाही. तरीदेखील बनावट कागदपत्रे दाखवून व खोटी संमती दाखवून नागरिकांवर प्रकल्प लादला जात आहे. शिवाय विकसकांकडून धमकावणे, दबाव टाकणे व गुंडगिरीचे प्रकार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
“विशिष्ट गटांच्या फायद्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. त्यामुळे स्थानिकांच्या जीवनमानावर परिणाम होतो आहे. शासनाने हस्तक्षेप करून हा बोगस प्रकल्प रद्द करावा,” अशी ठाम मागणी कृतीसमितीने केली आहे.
मोहोळ हे नेहमीच सामान्य जनतेच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यांच्या हस्तक्षेपातून निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.


