पुणे : न्यायव्यवस्था ही शासनव्यवस्थेच्या सर्वात महत्त्वाच्या स्तंभांपैकी एक मानली जाते. लोकांना न्याय मिळाल्याने मनःशांती आणि समाधान मिळते. न्याय मिळवून देणे ही सामाजिक सेवा आहे. वकीलांकडे लोकांना न्याय मिळवून देण्याची ताकद आहे. समता, प्रामाणिकपणा आणि न्याय्यता हा न्यायव्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालय माजी न्यायमूर्ती डॉ. एस.एस. फणसाळकर-जोशी यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स – जाधवर कॉलेज ऑफ लॉ तर्फे ‘राष्ट्रीय परिसंवाद कायदा व करिअरच्या संधी २०२५’ या परिषदेचे आयोजन नऱ्हे येथील डॉ. सुधाकरराव जाधवर एज्युकेशनल कॅम्पस येथे करण्यात आले. याचे उद्घाटन डॉ. एस. एस. फणसाळकर-जोशी, यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्य परिवहन अपील न्यायाधिकरण (छ. संभाजी नगर) अध्यक्ष रामेश्वर व्ही. जटाले, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड. शार्दुल जाधवर यांसह जाधवर कॉलेज ऑफ लॉ च्या प्राचार्य व पदाधिकारी उपस्थित होते. मूट कोर्ट सोसायटी इस्टॅब्लिशमेंट पुस्तकाचे प्रकाशन यावेळी झाले.
रामेश्वर जटाले म्हणाले, सभ्यता असलेला समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. उच्चतम विकसित असलेला समाज घडवायचा आहे. आपला इतिहास हा संघर्षांचा आणि मानवी हक्कांच्या लढ्यांचा आहे. मानवी हक्कांचे संरक्षण ही आपल्यासाठी लक्ष्मणरेषा आहे, आणि भारताची राज्यघटना ही आपल्यासाठी गीता आहे.
ॲड. शार्दुल जाधवर म्हणाले, आयुष्यात पुढे जात असताना आपण नैतिकता पाळणे गरजेचे आहे. तळागाळातील लोकांना कशाप्रकारे न्याय देऊ शकतो याचा विचार केला पाहिजे. वकिलीतून अर्थार्जन करत असताना गरीब गरजू लोकांना मोफत न्याय देता येईल का याचा विचार करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.


