पुणे, दि. २४ डिसेंबर : ‘अभंग’ ह्या काव्याप्रकाराचा वापर करून सुप्रसिध्द कवी व वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘विवेक संहिता’ हा आधुनिक अभंगसंग्रह रचला आहे. या अभंगसंग्रहाचे प्रकाशन दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात येणार आहे. ही माहिती पत्रकार परिषदेत स्वतः कवी डॉ. संजय उपाध्ये आणि प्रकाशन समारंभाचे आयोजक सर्वश्री सुहास पोफळे, राजाभाऊ गोलांडे आणि अवधूत कुलकर्णी यांनी दिली.
प्रसिद्ध ‘गप्पाष्टक’, ‘मन करा रे प्रसन्न’ अशा विविध निखळ मनोरंजनात्मक परंतु, प्रबोधन करणार्या एकपात्री कार्यक्रमांचे संकल्पक आणि सादरकर्ते, सुप्रसिध्द कवी, गीतकार, प्रवचनकार आणि वक्ते डॉ. संजय उपाध्ये यांनी रचलेल्या ‘विवेक संहिता’ या आधुनिक अभंगसंग्रहाचे प्रकाशन दोन टप्प्यात होणार आहे. शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यातील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शुभहस्ते त्यांच्याच कार्यालयात होईल. तसेच रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी, चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालय येथे होणार आहे. डॉ. संजय उपाध्ये हे गेली सहा वर्षे सतत, महिन्यातून एका रविवारी या ठिकाणी प्रवचन करीत आहेत. या प्रवचनांना सातत्याने आवर्जून उपस्थित राहणार्या काही निवडक श्रोत्यांच्या हस्ते याचे प्रकाशन करण्यात येईल.
या स्वरचित अभंगसंग्रहाबद्दल बोलतांना डॉ. संजय उपाध्ये यांनी सांगितले की, अत्यंत सोप्या आणि सरळ भाषेत वाचकांना त्यांच्या जीवनातील संभ्रम, अडचणी, निराशा इत्यादिंवर मात करण्याचे मार्ग सुचवले आहेत. वाचक यातून नक्कीच बोध घेतील आणि स्वतःचा व पर्यायाने समाजाचा जीवनमार्ग उजळून काढतील .
महाराष्ट्र राज्य ही संतांची भूमी म्हणून जरी ओळखली जात असली तरी, महाराष्ट्राप्रमाणेच भारतभर संत सज्जनांची मांदियाळी दिसून येते. भक्तिमार्गातून आत्मज्ञानाची जाणीव आणि सद्गुण, सद्विचार आणि सद्वर्तनाचे धडे जनसामान्यांना देण्याचे महत्कार्य या सर्वच संतांनी केले. त्यासाठी त्यांनी अभंग, भजनं, ओव्या, चौपाई, दोहे, थिरुक्कुरल, हरिकथाकलाक्षेपम् इ. प्रकारच्या काव्य प्रकारांचा वापर केला, ज्यायोगे त्यांची शिकवण अधिक सुलभपणे लोकांपर्यंत पोहचू शकेल.
‘अभंग’ या काव्याप्रकाराचा वापर करून, डॉ. उपाध्ये यांनी प्रस्तुत पुस्तकाची रचना केली आहे. माणसाच्या मनातील विवेकबुध्दीला आवाहन करून, या संग्रहाद्वारे १०१ अभंगरचनांच्या माध्यमातून समाजाला विवेक मार्गाने जगण्याचा रस्ता दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘आधुनिक उद्यान विवेकतरूंचे’ असे संबोधून पुस्तकाची दिशा वाचकांसमोर स्पष्ट केली आहे, तसेच संतपरंपरेचा चिरंतर संदेश आजच्या पिढीपर्यंत पोचवला आहे.


