पुणे : कवी अनिल यांनी म्हटल्याप्रमाणे, सारेच दीप कसे मंदावले आता, ज्योती विझू विझू झाल्या…अशी सध्याची परिस्थिती झाली आहे. मात्र न. म. जोशींसारख्या व्यक्तिमत्त्वाचा सन्मान म्हणजे “देवा, अजून अंधार झाला नाही” असे म्हणायला हरकत नाही. बालांपासून थोरांपर्यंत लोकप्रिय असलेले न. म. जोशी अंधारातील दिव्यासारखे प्रकाशमान करणारे आहेत, असे मत मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी व्यक्त केले.
आदिश जैन फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. न. म. जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक सु. द. वैद्य, पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र साहित्य परिषद व अमरेंद्र भास्कर बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे, ज्येष्ठ साहित्यिक वि. ग. सातपुते, फाउंडेशनच्या अध्यक्ष मृणाल जैन, विश्वस्त हेमंत जैन, म. भा. चव्हाण, श्रीपाल ललवाणी, डॉ. दिलीप गरुड, विजय सातपुते, राजश्री सोले, रसिका शाळीग्राम, मिलिंद जोगळेकर आदी उपस्थित होते. शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह व अक्षरधन असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमात न. म. जोशी यांच्या साहित्याचे अभिवाचन देखील करण्यात आले.
डॉ. न. म. जोशी म्हणाले, जीवनात कोणताही श्रम लहान मानू नये; प्रत्येक मेहनतीचे फळ मिळते. मी वर्तमानपत्र टाकण्याचे काम कमी समजलो असतो, तर माझी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट झाली नसती. श्रम आणि नम्रतेतच खरी मुल्यवान माणसे घडतात. त्यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद नाकारल्यानंतर विं. दा. करंदीकर यांनी केलेल्या फोनच्या आठवणींना उजाळा दिला .आदिश जैन फाउंडेशनने दिलेला हा जीवगौरव पुरस्कार माझ्यासाठी पद्म पुरस्कार इतकाच महत्वाचा आहे..त्याचा मी सहर्ष स्विकार करतो, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करीत सन्मान सोहळ्याचा स्वीकार केला
.


