: नेपाळ : भारतातील माध्यमे आणि द्विपक्षीय संबंधांवर सखोल विचारमंथन!
काठमांडू, नेपाळ / संतोष सिंह लांजेवार
काठमांडू, नेपाळ येथे “हुकुमाचा ताबेदार” या साप्ताहिकाच्या प्रकाशनाचा सोहळा अत्यंत थाटात आणि विचारप्रवर्तक वातावरणात पार पडला.
या विशेष प्रसंगी इंडियन मीडिया जर्नलिस्ट युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाला भास्कर, नेपाळ संविधान सभा सदस्य कमला विश्वकर्मा, फेडरेशन ऑफ नेपाळी जर्नलिस्ट्चे उपाध्यक्ष उमीद बागचोंड, नेपाळ संविधान सभा सदस्य बिनोद पहाडी, इंडियन मीडिया जर्नलिस्ट युनियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा हुकूमाचा ताबेदार या साप्ताहिकाचे प्रबंध संपादक संतोष सिंह लांजेवार, इंडियन मीडिया जर्नलिस्ट युनियनचे महासचिव हरीकिशन यादव, कौन्सिल मेंबर कृष्णमूर्ती सगाराम प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते साप्ताहिकाचे प्रकाशन पार पडले.
सोहळा केवळ प्रकाशनापुरता मर्यादित न राहता, हा भारत–नेपाळ संबंधांवर सखोल मंथन करणारा बौद्धिक मंच ठरला.
@माध्यमे आणि द्विपक्षीय संबंधांवर सखोल विचारमंथन!
साप्ताहिकाच्या प्रकाशन समारंभात भारत आणि नेपाळ यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि माध्यमीय संबंधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
देवभूमी आणि हिंदू संस्कृतीचा समान वारसा, इतिहास-संस्कृती-भाषा व सीमांचे सामायिकरण, सुलभ सीमा व्यवस्था, दोन्ही देशांतील माध्यमांची भूमिका, सीमा सुरक्षा व देशाची वाढ, संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम तसेच संपर्क तपशील सामायिक करून बातम्यांचे परस्पर कव्हरेज या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल विचार व्यक्त करण्यात आले.
@माध्यमांची भूमिका : संधी आणि आव्हाने
चर्चेदरम्यान माध्यमांच्या प्रभावी भूमिकेवर प्रकाश टाकताना वक्त्यांनी असे नमूद केले की, माध्यमे ही केवळ माहिती पोहोचवणारी यंत्रणा नसून जनमत घडविणारी शक्ती आहे. मात्र, माध्यमांचे वर्चस्व, अति राष्ट्रवादी वृत्तांकन आणि संतुलित प्रतिनिधित्वाचा अभाव ही आव्हाने आजही कायम आहेत. अशा परिस्थितीत जबाबदार पत्रकारिता, नैतिक वृत्तांकन आणि विधायक संवादाची नितांत गरज असल्याचे मत सर्व वक्त्यांनी एकमताने मांडले.
भारत–नेपाळ माध्यमीय सहकार्य अधिक मजबूत व्हावे, गैरसमज दूर व्हावेत आणि परस्पर विश्वास वाढावा यासाठी माध्यमांनी समन्वयाची भूमिका घ्यावी, असे त्यांनी अधोरेखित केले.
मान्यवरांच्या मतांतील निष्कर्ष
भारत आणि नेपाळ यांच्यातील माध्यमांचे नाते अत्यंत शक्तिशाली आणि प्रभावशाली आहे. त्याचा योग्य आणि जबाबदार वापर झाला तर मैत्री, विश्वास आणि सहकार्य अधिक दृढ होऊ शकते; मात्र गैरवापर झाल्यास गैरसमज वाढू शकतात. म्हणूनच, माध्यमांनी केवळ बातम्यांचे दूत न राहता, दोन्ही (भारत – नेपाळ) राष्ट्रांमधील समजूतदारपणाचा सेतू म्हणून काम करणे ही काळाची गरज असल्याचे या प्रकाशन समारंभातून ठळकपणे अधोरेखित झाले.
————————


