Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedशाश्वत भूजल व्यवस्थापनावर १७ फेब्रुवारीला यशदा येथे राज्यस्तरीय कार्यशाळा*

शाश्वत भूजल व्यवस्थापनावर १७ फेब्रुवारीला यशदा येथे राज्यस्तरीय कार्यशाळा*

 

 

पुणे, दि. १३ (जिमाका वृत्तसेवा) – जलशक्ती मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय भूजल मंडळ, मध्य क्षेत्र, नागपूर यांच्यावतीने “शाश्वत भूजल व्यवस्थापन सुनिश्चित करणे : राष्ट्रीय जलधर नकाशेकरण निष्कर्ष आणि माहिती प्रसार” या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता यशदा, पुणे येथे करण्यात आले आहे.

 

जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय जलधर नकाशेकरण आणि व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या अभ्यासांचे मुख्य निष्कर्ष सादर करणे व संबंधित माहितीचा व्यापक प्रसार करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे. प्रादेशिक संचालक डॉ. उमेश बालपांडे, केंद्रीय भूजल मंडळ, मध्य क्षेत्र, नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या कार्यशाळेत केंद्रीय भूजल मंडळामार्फत संकलित व विश्लेषित करण्यात आलेली वैज्ञानिक माहिती, तांत्रिक दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेली व्यवस्थापन धोरणे तसेच विविध डिजिटल आणि संस्थात्मक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात आलेली भूजलविषयक माहिती सादर केली जाणार आहे. या उपक्रमाद्वारे विश्वासार्ह भूजल माहितीची उपलब्धता वाढविणे, तसेच संबंधित भागधारकांच्या निर्णयक्षमतेत वाढ घडवून आणणे अपेक्षित आहे.

 

कार्यशाळेत धोरणकर्ते, विविध विभागांचे अधिकारी, तांत्रिक तज्ज्ञ, जलसंपदा व्यवस्थापक, संशोधक व इतर संबंधित घटक सहभागी होणार असून राज्यातील शाश्वत भूजल व्यवस्थापन धोरणांवर सखोल चर्चा करण्यात येणार आहे. भूजल संसाधन व्यवस्थापनातील उदयोन्मुख आव्हानांचा आढावा घेऊन दीर्घकालीन जलसुरक्षेसाठी वैज्ञानिक व व्यावहारिक उपाययोजनांवरही विचारमंथन केले जाणार आहे.

 

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, सुदूर अन्वेषण, कृषी व जलसंपदा विभाग, केंद्रीय जल आयोग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, फर्ग्युसन महाविद्यालय तसेच इतर मान्यवर संस्थांचे प्रतिनिधी, भूजलतज्ज्ञ, अभियंते व विद्यार्थी या कार्यशाळेस उपस्थित राहणार आहेत.

 

केंद्रीय भूजल मंडळ ही जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कार्यरत प्रमुख वैज्ञानिक संस्था असून देशातील भूजल संसाधनांच्या विकास व व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे. वैज्ञानिक अभ्यास, सतत निरीक्षण व धोरणात्मक मार्गदर्शनाच्या माध्यमातून शाश्वत आणि समतोल भूजल व्यवस्थापनासाठी मंडळ कार्यरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments