Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedखरीप हंगाम २०२६ पूर्वतयारीबाबत खत व बियाणे विक्रेत्यांना प्रशासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश*

खरीप हंगाम २०२६ पूर्वतयारीबाबत खत व बियाणे विक्रेत्यांना प्रशासनाचे महत्त्वपूर्ण निर्देश*

 

 

पुणे, दि. २३ (जिमाका वृत्तसेवा) : खरीप हंगाम २०२६ मध्ये शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाण्यांचा सुरळीत आणि पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षित साठा सनियंत्रण समिती तसेच जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची आढावा बैठक दि. २२ एप्रिल २०२६ रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पुणे जिल्ह्यातील खत उत्पादक कंपन्या, बियाणे उत्पादक, वितरक, वाहतूकदार, नोडल एजन्सी आणि संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशासनाने महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.

 

बैठकीस जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र दुडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. संजय काचोळे, कृषी विकास अधिकारी श्री. अजित पिसाळ, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. धनंजय पाटील तसेच महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, सहकारी विकास महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. काचोळे यांनी सांगितले की, खरीप हंगामात खत व बियाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सर्व कंपन्यांनी कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त आवंटनानुसार वेळेत पुरवठा करणे आवश्यक आहे. मंजूर साठ्यापैकी जास्तीत जास्त खत पुरवठा एप्रिल, मे आणि जून महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. विशेषतः जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्तेमार्गे खत पोहोचविण्यावर भर देण्यात आला.

 

दौंड, बारामती आणि सासवड रोड येथील रेल्वे स्थानकांवर खत वाहतुकीस सिमेंट व इतर मालवाहतुकीपेक्षा प्राधान्य देण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. युरिया व डीएपी खताची रेक जिल्ह्यात दाखल होण्यापूर्वी तालुकानिहाय पुरवठा नियोजन संबंधित कृषी विकास अधिकाऱ्यांकडून मंजूर करून घेणे बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

वाहतूकदारांच्या करारातील विलंबामुळे खतपुरवठा विस्कळीत होऊ नये, यासाठी सर्व कंपन्यांनी वाहतूक करार वेळेत नूतनीकरण करावेत, अन्यथा संबंधित कंपनीस जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला. जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये खताचे संतुलित वितरण व्हावे आणि कोणत्याही तालुक्यात कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी कंपन्यांनी दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या.

 

रासायनिक खतांसोबत अनावश्यक किंवा मागणी नसलेल्या उत्पादनांची सक्ती विक्रेत्यांवर करू नये, असे स्पष्ट करण्यात आले. अशा तक्रारी आढळल्यास संबंधित कंपनी किंवा वितरकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

 

संरक्षित खत साठ्याबाबत जिल्ह्यासाठी नियुक्त नोडल एजन्सींनी एप्रिल अखेर किमान ६० टक्के आणि मे अखेर १०० टक्के बफर स्टॉक उभारण्याचे निर्देश देण्यात आले. बफर स्टॉक करणाऱ्या एजन्सींनी तालुका कृषी अधिकारी आणि गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांशी सातत्याने संपर्क ठेवून कोणत्याही तालुक्यात खताची कमतरता भासणार नाही याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले.

 

बियाणे पुरवठ्याबाबत कृषी विकास अधिकाऱ्यांनी बियाणे कंपन्या आणि वितरकांची स्वतंत्र बैठक घेऊन पेरणी क्षेत्रानुसार आवश्यक बियाणे उपलब्ध राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. विशेषतः इंद्रायणी भात व उडीद बियाण्याचा पुरेसा साठा ठेवण्यावर भर देण्यात आला. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यास बाजरी, सोयाबीन आणि भात या पिकांचे अतिरिक्त बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कंपन्यांनी तयारी ठेवावी, असेही स्पष्ट करण्यात आले.

 

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी खत व बियाणे पुरवठा साखळीतील सर्व घटकांनी समन्वयाने कार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने यावेळी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments