Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedकवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी जेष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांचे विचार...

कवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी जेष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांचे विचार से. नि. प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील लिखित ‘ रानफुले ‘ काव्य संग्रहाचे प्रकाशन

पुणे, २४ एप्रिल २०२६ : “कविता वाचकांना डोळस बनवते. काव्यामधून आलेला शुद्ध सर्जनशील विचार मानवाला नवीन दृष्टी देतो. कवितेतून पर्यावरण संवर्धनाची दृष्टी महत्वाची असून पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी साहित्य निर्मिती व्हावी.” असे विचार सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी व्यक्त केले. जागतिक वसुंधरा दिवस आणि जागतिक पुस्तक दिनानिमित्त कॉन्फरन्स हॉल, वनभवन, गोखलेनगर येथे साहित्यविश्व प्रकाशन आयोजित, सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. शेषराव पाटील लिखित ‘रानफुले’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
पुणे वनवृत्त (प्रा) पुणेचे वनसंरक्षक आशिष ठाकरे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. से. नि. मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, प्रभावती वाघ, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, कवी डॉ. शेषराव पाटील, वर्षा शेषराव पाटील, प्रकाशक विक्रम मालन आप्पासो. शिंदे, रामदास पुजारी हे यावेळी उपस्थित होते.

डॉ. विठ्ठल वाघ म्हणाले,” जल, जमीन ,जंगल वाचवण्याची आज परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांना मोकळा श्वास द्यायचा असेल तर पर्यावरणातील घटकांना जपले पाहिजे. यासाठी प्रबोधन महत्त्वाचे असून कविता प्रभावी माध्यम ठरते. डॉ. शेषराव पाटील यांची पर्यावरणावरील कविता ही आधुनिक काळातील ‘वनाचे श्लोक’ असून निसर्गाचे महत्त्व दाखवून देते.”

डॉ. शेषराव पाटील म्हणाले,” पर्यावरणातील अनुभवांचे, निरीक्षणांचे, गरजांचे, उपायांचे, संवर्धनाचे ‘ रानफुले ‘ मध्ये संचित मांडले आहे. पर्यावरण जनजागृती हा विचार घेऊन अनेक कविता लिहल्या आहेत.”

रंगनाथ नाईकडे म्हणाले, ” झाडे, वने ही वसुंधरेची कवच कुंडले आहेत. मानव आपल्या स्वार्थासाठी वृक्षतोडीतून पर्यावरणाचा नाश करत आहे. वसुंधरा वाचवायची असेल तर वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन हा एकच उपाय आहे.”

पंकज गर्ग म्हणाले, “अलीकडे मानवी समाजात लिखाण करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे लोकांमधील एकाग्रता कमी होत आहे. लिहिणे, वाचणे व लिखाणाचे दस्तऐवजीकरण या आपल्या मूलभूत सवयी झाल्या पाहिजेत.”

डॉ. विठ्ठल वाघ यांनी या कार्यक्रमांत शेती माती वरील अनेक कवितांचे गायन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रामदास पुजारी यांनी केले. प्रकाशक विक्रम मालन आप्पासो. शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments