Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारताचा 'आत्मबोध' जागृत करून 'शत्रूबोधा'ची ओळख करून घेणे काळाची गरज* : *प्रफुल्ल...

भारताचा ‘आत्मबोध’ जागृत करून ‘शत्रूबोधा’ची ओळख करून घेणे काळाची गरज* : *प्रफुल्ल केतकर*

‘ *आधुनिक भारतासमोरील आव्हाने’ पुस्तकाचे प्रकाशन*
पुणे: सध्याच्या परिस्थितीत भारतीयांचा आत्मबोध क्षीण झाला असून त्यांना शत्रूबोधाचीही जाणीव नाही. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. इतिहासात असा आत्मबोध केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि चाणक्य यांनाच होता. आजच्या काळात आपला आत्मबोध पक्का करणे आणि समाजाला खऱ्या शत्रूंची ओळख करून देणे हेच मोठे आव्हान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’चे संपादक प्रफुल्ल केतकर यांनी केले.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या (मएसो) दृक-श्राव्य सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात ‘आधुनिक भारतासमोरील आव्हाने’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचे लेखन सागर शिंदे, डॉ. पंकज जयस्वाल, रूपाली भुसारी आणि योगेश्वर घोगले यांनी केले आहे.
केतकर पुढे म्हणाले की, “नेहरूंच्या काळात स्वधर्म, स्वदेशी आणि स्वभाषा या संकल्पना क्षीण झाल्या होत्या आणि भारतीय असण्याची लाज वाटू लागली होती. मात्र आता परिस्थिती बदलत आहे. ‘मेरा ही सही’ हा अभारतीय विचार असून ‘मेरा भी सही’ हा उदात्त भारतीय विचार आहे. ‘सर्वे भवंतु सुखिन:’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ ही मूल्ये केवळ भारतातच जोपासली जातात.”
पुस्तकाची प्रस्तावना लिहिणारे प्रसिद्ध लेखक अभिजीत जोग यांनी यावेळी पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केली. इतिहास हा संघर्षाच्या विचारधारांमधूनच घडतो. एकच विचारधारा उरेल आणि ती राबवता येईल, ही समजूत चुकीची आहे. शहरी नक्षलवाद, जागतिक बाजारपेठ व्यवस्था, ख्रिश्चॅनिटी आणि मूलतत्ववादी इस्लाम या चार निरंकुशतावादी शक्ती आहेत. या शक्ती आपापसात स्पर्धक असल्या, तरी भारताविरुद्ध मात्र त्या एकत्र येतात. कारण भारताचा विचार हा त्यांच्या निरंकुशतेला दिलेले उत्तर आहे. हे युद्ध प्रत्यक्ष नसून अंतर्गत बंडाळी माजवून समाज उद्ध्वस्त करणे आणि राष्ट्र संपवणे हा या शक्तींचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘भाविसा’चे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे यांनी प्रास्ताविक केले, तर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह नितीन देशपांडे उपस्थित होते.गरवारे महाविद्यालयाच्या वृत्तपत्र आणि जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख विनय चाटी यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments