पुणे : भारतीय परंपरेत प्राचीन काळापासून विविध विषयांवर शास्त्रार्थ आणि वादसंवादाची समृद्ध परंपरा राहिली आहे. ज्ञानाची चिकित्सा, विविध मतप्रवाहांचा अभ्यास आणि सत्याचा शोध या उद्देशाने आयोजित केल्या जाणाऱ्या अशा वादसभांनी भारतीय वैचारिक परंपरा अधिक समृद्ध केली. याच परंपरेचा जागर करत प्रसाद प्रकाशन आणि विज्ञान भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस. एम. जोशी सभागृह, गांजेवे चौक, पुणे येथे पुरस्कार विशेष वादसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पुरस्कार वितरण, ग्रंथ प्रकाशन देखील होणार आहे अशी माहिती प्रसाद प्रकाशनच्या संचालिका डॉ. उमा बोडस यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ प्रा. प्र. के. घाणेकर हे असणार आहेत. माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे विचारक राजेश पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे आणि भारतीय विद्या तज्ज्ञ आशुतोष बापट यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण असलेल्या वादसभेचा विषय ‘प्राचीन शास्त्रे किती खरी’ असा आहे. या वादसभेच्या न्यायाध्यक्षपदी डॉ. नितीन करमळकर असतील. वादसभेत डॉ. माधवी गोडबोले, डॉ. मनीषा पुराणिक, डॉ. मनीष वाळवेकर, डॉ. अंबरीष खरे, श्री. रमेश दाते आणि डॉ. दीप्ती सिधये हे सहभागी होऊन विषयाच्या विविध पैलूंवर आपली मते मांडणार आहेत.
याशिवाय प्रसाद प्रकाशन आणि अनाहत प्रकाशन यांच्या विविध पुस्तकांचे प्रकाशनही या कार्यक्रमात होणार आहे. प्रलय कथा, प्राचीन भारतीय भौतिकशास्त्र, भारताचे राजवैभव, देव जसा आहे आहे तसा का आहे, कुंभमेळा, नाती, आनंदाची मोळी यांसह विविध ग्रंथांचे प्रकाशन या वेळी करण्यात येणार आहे.
—


