Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedरक्तदानातून मानवतेचा श्वास जपू : नरेंद्राचार्यजी* *परमवंदनीय समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज...

रक्तदानातून मानवतेचा श्वास जपू : नरेंद्राचार्यजी* *परमवंदनीय समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त ‘ब्लड इन नीड’  सेवेचा अखिल भारतीय विस्तार मोबाइल ॲपचे लोकार्पण*

पुणे : रक्तदानातून माणसाचा श्वास आणि वृक्षसंवर्धनातून सृष्टीचा श्वास अखंड राहतो. सेवा हीच भारतीय संस्कृतीची खरी ओळख असून, आपल्याला मिळालेल्या ज्ञान, सामर्थ्य, संपत्ती आणि कर्तृत्वाचा उपयोग समाजकल्याणासाठी झाला पाहिजे. रक्तदान आणि वृक्षसंवर्धन या दोन्ही सेवा मानवतेच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून, या सेवायज्ञात समाजातील प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी केले.

समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त खराडी येथील महालक्ष्मी लॉन्स येथे ‘ब्लड इन नीड’ या मानवतावादी रक्तसेवेच्या देशव्यापी विस्ताराचा कार्यक्रम तसेच ‘ऋणानुबंध’ मोबाईल ॲप्लिकेशनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नरेंद्राचार्यजी बोलत होते. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुहास मोहनळकर, वरिष्ठ पत्रकार अंकित काणे, डॉ. रचना पवार आदी उपस्थित होते.

नरेंद्राचार्यजी म्हणाले, “जीवनाची खरी समृद्धी आपण किती मिळवले यावर ठरत नाही; आपल्या अस्तित्वामुळे किती जीवांना आधार मिळाला, यावर ती ठरते. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने ज्ञानयज्ञ करावा, ज्याच्याकडे श्रमशक्ती आहे त्याने श्रमयज्ञ करावा आणि ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याने दानयज्ञ करावा. आजच्या काळात निरोगी व्यक्तीने रक्तदानाचा यज्ञ करावा आणि संवेदनशील मनाच्या प्रत्येक व्यक्तीने रक्तमित्र बनून या करुणामय सेवेत सहभागी व्हावे. एखाद्या जीवाला जीवदान मिळाले, यापेक्षा श्रेष्ठ यज्ञ दुसरा कोणताही असू शकत नाही.”

सयाजी शिंदे म्हणाले,  “झाड आधी आले आणि मग माणूस आला. माणूस कितीही मोठा झाला, सेलिब्रिटी झाला तरी तो ऑक्सिजन तयार करू शकत नाही. तो त्याला झाडापासूनच मिळतो. त्यामुळं झाड हेच माझ्यासाठी सेलिब्रिटी आहे. सकाळी उठल्यावर श्वास भरून ऑक्सिजन घेता येणे ही खरी श्रीमंती आहे. ही श्रीमंती टिकवण्यासाठी आपण झाडे लावली पाहिजेत.”

रुग्णसेवेपासून ते शेतकऱ्यांच्या सेवेपर्यंत आणि मोफत शिक्षणापासून ते वृक्षसंवर्धनापर्यंत अशा विविध क्षेत्रांमध्ये नरेंद्रचार्य महाराज यांचे कार्य बघून मी आश्चर्यचकित झालो आहे. त्यांचे कार्य केवळ एका व्यक्ती किंवा संस्थेपुरते मर्यादित नाही तर समाजाला त्यांची गरज आहे. आज ज्यावेळी माणुसकी हरवत चालली आहे अशावेळी नरेंद्राचार्य महाराजांच्या मानवतावादी कार्याची समाजाला नितांत गरज आहे असेही शिंदे यांनी नमूद केले. 

अंकित काणे म्हणाले, “हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. ज्याला जी गरज आहे, त्याला ती पुरवणं हा सेवाभाव आपला धर्म शिकवतो. या सेवा धर्माची जपणूक नरेंद्राचार्यजी करत आहेत. धर्माचं तत्वज्ञान कृतीत आणणाऱ्या त्यांच्या सारख्या माणसांच्या आपण मागे उभं राहिलं पाहिजे.”

रक्ताची गरज असलेल्या माणसाला रक्तदात्यापर्यंत पोहोचवून देण्याचं मोलाचं काम करणारे हे कदाचित पहिले ऍप असेल. शासनाच्या माध्यमातून ही संकल्पना कशी व्यापक करता येईल. या बाजूनेही प्रयत्न करणार असल्याची माहिती डॉ. मोहनाळकर यांनी दिली.
निरोगी असणं हीच खरी संपत्ती आहे. निरोगी माणसाने रक्तदान केल्यानंतर त्यातून जीवदानाचे काम होऊ शकते, असं डॉ. रचना पवार यांनी सांगितले.
यावेळी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी ऍपची कार्यप्रणाली कशी चालते, हे उपस्थितांना डेमोच्या माध्यमातून समजावून सांगितले.
ब्लड इन नीड या ऍपच्या उभारणीत योगदान दिलेल्या तरुण उच्चशिक्षित सेवक-सेविकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या ऍपवर पाच लाखांहून अधिक रक्तदाते आणि रक्तमित्र यांची नोंद झाली असून ब्लड इन नीड हे ऍप डाउनलोड करून रक्तदानाच्या या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
निवेदन श्रद्धा बोडेकर यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments