पुणे, दि. १० (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी पुण्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, उमेदवार तसेच भरती परीक्षा प्रक्रियेशी संबंधित विविध घटकांशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.
*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत ही सल्लामसलत होणार आहे. पुणे हे राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारीचे प्रमुख केंद्र असल्याने, पुणे जिल्ह्यासह पुणे महसूल विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा, विषयतज्ज्ञ आणि संबंधित घटकांचा या संवादात सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.*
*परीक्षा प्रक्रियेतील अनुभव, अडचणी आणि सूचना मांडता येणार*
भरती परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांमध्ये येणाऱ्या अडचणी, उमेदवारांचे अनुभव, परीक्षा केंद्र व्यवस्थापन, प्रश्नपत्रिका व परीक्षा सुरक्षितता, तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शकता, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण तसेच परीक्षा पद्धतीत आवश्यक असलेल्या सुधारणांबाबत या सल्लामसलतीत थेट मते व सूचना मांडता येणार आहेत.
उच्चस्तरीय टास्क फोर्सकडून भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करण्यात येत असून, प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि उमेदवारांचा अनुभव या सुधारणांसाठी महत्त्वाचा आधार ठरणार आहे. त्यामुळे पुण्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व उमेदवारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या सूचना आणि अनुभव मांडावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
भरती परीक्षा अधिक विश्वासार्ह आणि उमेदवारांच्या दृष्टीने सुलभ करण्यासाठी होणाऱ्या या प्रक्रियेत पुण्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


