पुणे दि. १९ : शहराच्या सर्वांगीण
विकासात नागरिकांचा सक्रिय सहभागही महत्त्वाचा आहे. महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन पात्र नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा तसेच शहराच्या विकास आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’ अंतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित लोकसंवाद उपक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला, युवक, युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर*
राज्य शासन तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाज कल्याण विभागामार्फत महिलांसाठीच्या योजना, निराधार नागरिकांसाठीच्या योजना तसेच शैक्षणिक योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी योजनांचा प्रचार प्रसार करण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या योजनांचा महानगरपालिकेच्या उपक्रमांमध्ये समावेश करून त्याचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या योजनांची माहिती व त्यांचे लाभही पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या विविध विभागाच्या
तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर विविध योजना आणि उपक्रमांची माहिती उपलब्ध आहे. नागरिकांनी संकेतस्थळाला भेट देऊन योजनांची माहिती घ्यावी तसेच पात्र लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
*सांस्कृतिक उपक्रमांमध्येही नागरिकांचा सहभाग आवश्यक*
शहराचे वैभव केवळ भौतिक विकासातून नव्हे, तर सांस्कृतिक समृद्धीतूनही निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा. आगामी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही नागरिक, कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन
त्यांनी केले.
*’सारथी’ ॲपवर समस्या नोंदविण्याचे आवाहन*
नागरिकांच्या अडचणी आणि समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिकेचे ‘सारथी’ ॲप उपलब्ध आहे. नागरिकांनी आपल्या समस्या या ॲपवर नोंदवाव्यात, जेणेकरून त्यांची दखल घेऊन त्या सोडविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करता येईल, असेही आवाहन करण्यात आले.
यावेळी गझल गायक अशोक गायकवाड यांनी नागरिकांना लोकसंवाद उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
माहिती अधिकारी गणेश फुंदे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी लोकसंवाद उपक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे संयोजन उपसंपादक संदीप राठोड, जितेंद्र खंडागळे आणि विशाल तामसीकर यांनी केले.
कार्यक्रमास महिला, युवक, युवती तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.


