पुणे, १२ एप्रिल २०२४ : जंगल म्हणजे फक्त झाडे लावणे असा एक सामान्य गैरसमज असतो. आपण विशिष्ट परिसंस्थेचे महत्त्व समजून घेऊन त्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे मत भारतीय वन सेवा (आयएफएस) येथील सामाजिक वनीकरणाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी मांडले. महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) वनजा नेचर क्लबतर्फे आयोजित सामाजिक वनीकरण या विषयावरील सत्रात ते बोलत होते. यावेळी बीएनसीए येथील वनजा नेचर क्लब च्या संचालिका प्रा. अस्मिता जोशी, लँडस्केप आर्किटेक्चर विभागाच्या डॉ. स्वाती सहस्रबुद्धे प्रा.नेहा आडकर आणि वनजा क्लबचे विद्यार्थी व सदस्य उपस्थित होते.
गायरान प्रदेश, पाणथळ जमीन या अतिशय विशिष्ट परिसंस्थेची उदाहरणे देऊन खांडेकर म्हणाले की, जंगल म्हणजे केवळ झाडे लावणे नव्हे. भूदृश्य वास्तुरचनाकार म्हणून निसर्गाची रचना कशी आहे, याचे आपण निरीक्षण केले पाहिजे. आपण निसर्गाच्या विरुद्ध जाऊन भूमिका घेऊ नये. गायरान प्रदेश हा पडीक जमीन असा गैरसमज असतो,मात्र हा परिसंस्थेचाच एक भाग असून यामध्ये खरतर जैवविविधता जास्त प्रमाणात असते.
विवेक खांडेकर यांनी आपल्या सादरीकरणात रोपवाटिका उभारणे, वृक्षारोपण, ओसाड जमिनीवर वृक्षारोपण, जैवविविधता उद्यान अशा वनविभागाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
विवेक खांडेकर म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात सुमारे २० टक्के भाग हा भौगोलिक क्षेत्र जंगल म्हणून समाविष्ट आहे. ते पुढे म्हणाले की सामाजिक वनीकरण हे वनविभागाच्या तीन कार्यक्षेत्रांपैकी एक असून प्रादेशिक आणि वन्यजीव या इतर दोन शाखा समाविष्ट आहेत.


