पुणे : संविधान आज धोक्यात आहे. ज्यांच्यामुळे अस्पृश्यता आली ती वैदिक परंपरा आणि त्यातील ब्राह्मण्यवाद. यामध्ये माणसांची विभागणी करून विषमता निर्माण करण्यात आली. हे सर्व झुगारून संविधानाची निर्मिती करण्यात आली. स्त्री-पुरुष समान पातळीवर आणण्यात आले. परंतु, हे संविधान आज धोक्यात आहे. अखंड भारत, अस्पृश्यता आणि विषमता मुक्त भारतासाठीमोठ्या संख्येने मतदान करायला हवे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डाॅ. कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केले.
नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने ४ थ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी डाॅ.सप्तर्षी यांचे व्याख्यान झाले. संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर आणि उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर यांच्या संकल्पनेतून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, एका पक्षाला वाटते की, भारताला हिंदू राष्ट्र करावे आणि त्यासाठी ही घटना अडचणीची आहे. म्हणून इस बार ४०० पार असे म्हटले जात आहे. असे झाले तरच घटना बदलता येईल. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर कायम म्हणायचे तुम्ही दलित आहात तर मी ऑनररी दलित आहे. पुनर्जन्म अशी काही गोष्ट असेल तर मला दलित म्हणून जन्माला यायला आवडेल. अस्पृश्यता निर्मूलनासाठी आंबेडकर यांनी काॅंग्रेसच्या पूर्णवेळ कामाचा राजीनामा देखील दिला होता, असेही त्यांनी सांगितले.


