पुणे : पुणे शहर पोलीस आणि शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे मुंबई मध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ पुण्यामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस दलातर्फे बँडच्या माध्यमातून सारसबाग येथे शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
मंगळवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता सारसबाग येथे होणा-या मानवंदनेनंतर जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांनी दाखविलेल्या धाडसाला मानवंदना देण्यासाठी पुण्यातील पोलीस दलाच्या पुढाकाराने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच देशभक्तीपर व सामाजिक विषयांवरील कल्पना विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून मांडाव्यात आणि विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत होण्यासोबतच शहिदांना श्रद्धांजली अर्पण करावी, याकरीता चित्रकला स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात येते.
ही स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच खुल्या गटासाठी आयोजित करण्यात आली आहे. गट अ : १ली ते २री, गट ब : ३री ते ४थी याकरिता रंगभरण आणि गट क : ५वी ते ७वी , गट ड : ८वी ते १०वी व खुल्या गटात दिलेल्या विषयावर स्पर्धा होईल. स्पर्धकाने रंग व साहित्य स्वत: आणायचे असून कागद देण्यात येणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ लगेचच दुपारी १२ वाजता स्पर्धास्थळी होणार आहे.
सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे म्हणाले, स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ९९२२९६७८५२, ९८८१७९८१८२, ८८८८७७९३९३, ९८९०९३२६९३ या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेचे परीक्षण कला क्षेत्रातील मान्यवर करणार आहेत. ज्या शाळेतील सर्वाधिक स्पर्धक सहभागी होतील, त्या शाळेला विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. शाळांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्या नावांची यादी करुन संबंधित पोलीस स्टेशनमध्ये पाठवावी. तरी जास्तीत जास्त पुणेकर, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.


