Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedमराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा...

मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा-मराठी भाषा मंत्री उदय सामंत विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनाचा मंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा

पुणे, दि. २५: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे. पुस्तक महोत्सवाप्रमाणेच मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

फर्ग्युसन महाविद्यालय येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणाऱ्या विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पुणे विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापकीय सल्लागार सदस्य राजेश पांडे, अभिनेते प्रवीण तरडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळाचे प्राध्यापक, उच्च व तंत्रशिक्षण तसेच भाषा संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री सामंत म्हणाले, हे संमेलन मराठी भाषेच्या अस्मितेचे संमेलन आहे. या संमेलनात विविध कार्यक्रम होणार असून त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित, युवा आणि मराठी भाषा, स्त्री साहित्य आणि मराठी, बालसाहित्य, संत साहित्य आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात पोहोचलेल्या तरुण पिढीसाठी कार्यक्रम होणार आहेत असे सांगून ते म्हणाले यावर्षीपासून मराठी भाषा सातासमुद्रापार नेणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकाला साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावर्षीचा साहित्यभूषण पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, पुढच्या पिढीला मराठी भाषा कळावी, मराठी भाषेचे संवर्धन, जतन व्हावे हा मराठी भाषा विभागाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी पुण्यातील मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचे या संमेलनात सहकार्य आवश्यक आहे. सर्व विद्यापीठांच्या भाषा विभागांनीही हे संमेलन यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

संमेलनाला येणाऱ्या २५ हजार विद्यार्थ्यांना पुस्तक महोत्सव समितीच्या माध्यमातून एक एक पुस्तक भेट देण्यात येणार आहे. तसेच या संमेलनामध्ये पुस्तक आदान- प्रदान करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी डोंबिवलीच्या पै फाउंडेशन संस्थेकडून २ लाख ५० हजार पुस्तके आणण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत स्वतः जवळची वाचून झालेली पुस्तके जमा करून संमेलनस्थळी उपलब्ध असलेले पुस्तक बदलून घेता येणार आहे. विश्व मराठी संमेलनाच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने पुणे दुसऱ्यांदा जागतिक स्तरावर जाईल असा विश्वास श्री. सामंत यांनी व्यक्त केला.

यावेळी भाषा विभागाच्यावतीने संमेलन स्थळाचे मुख्य प्रवेशद्वार, कार्यक्रम पत्रिका, शोभायात्रा, संमेलन स्थळी उभारण्यात येणारी दालने, प्रवेशद्वारावर लावण्यात येणारे फलक आदीबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments