Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorized- छत्रपती संभाजीनगर येथील विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन

– छत्रपती संभाजीनगर येथील विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन

*दि.१७फेब्रुवारी२०२५:-* महापालिकेने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामुळे महापुरुषांच्या विचारांना नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार व प्रसार होत असून त्यामाध्यमातून सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १६ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, चिंचवड येथील कमलनयन बजाज शाळेजवळ साईकिरण मित्रमंडळाच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या हस्ते काल झाले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास माजी महापौर मंगला कदम, उपआयुक्त अण्णा बोदडे, पोलीस निरीक्षक गोरख कुंभार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच साईकिरण मित्र मंडळाचे कुशाग्र कदम,विशाल नारखेडे, संजय कलागते, गिरीश तेलंग, अजित कडोलकर, मंगेश गुंजाळ, प्रवीण यादव संतोष वऱ्हाडी, नितीन जाधव, यांसह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काल प्रबोधन पर्वाच्या सुरुवातीस सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची कुशल राजनीती, शौर्य तसेच पराक्रम या विषयांवर आपल्या प्रभावी काव्य सादरीकरणातून नागरिकांचे प्रबोधन केले.

कवी अनंत राऊत यांनी आपल्या काव्यमय प्रबोधनात मैत्रीचे महत्त्व, तसेच आई-वडिलांचे आपल्या मुलांसाठी असलेले त्याग, कष्ट आणि उपकार यावर विशेष भर दिला. त्यांच्या कवितांमधून या नात्यांचे गहिरे आणि भावनिक पैलू प्रभावीपणे मांडले गेले. अनंत राऊत यांनी आपल्या कवितांमध्ये खऱ्या मैत्रीचे सौंदर्य आणि मूल्य यावर भाष्य केले. खऱ्या मित्राची साथ संकटात ओळखली जाते. मित्र फक्त सोबत फिरण्यासाठी नसतो, तर कठीण प्रसंगात खंबीरपणे उभा राहतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी मावळे यांच्या मधील निस्वार्थ मैत्रीचा व त्यागाचा उल्लेखही त्यांनी केला.

कवी अनंत राऊत म्हणाले, आई आपल्या लेकरासाठी झोपेच्या वेळा विसरते, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवते आणि फक्त मुलांच्या सुखासाठी आयुष्य समर्पित करते असे सांगून त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करणाऱ्या राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या यशस्वी प्रयत्नांबद्दल माहिती दिली.

वडील आयुष्यभर कष्ट करून आपल्या मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मेहनत करतात. स्वतःच्या इच्छांना दुय्यम स्थान देऊन संपूर्ण कुटुंबासाठी अहोरात्र झटतात. कवी राऊत यांनी स्वतःच्या भावनांना बाजूला ठेवणाऱ्या वडिलांच्या त्यागाला वंदन करणारी कविता सादर केली, या कवितांनी प्रेक्षकांमध्ये एक वेगळा भावनिक ठसा उमटवला. आई-वडिलांचे त्याग आणि प्रेम कधीही विसरू नये आणि खऱ्या मैत्रीला जपावे असा सकारात्मक संदेश त्यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments