Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedछत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला त्याग, समर्पण, विचार आत्मसात करावे- योगेश सुपेकर

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला त्याग, समर्पण, विचार आत्मसात करावे- योगेश सुपेकर

पिंपरी, दि. १८ फेब्रुवारी २०२५ : छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रशासन व्यवस्था, त्यांचे नेतृत्व, स्वाभिमान आणि कष्ट करण्याची जिद्द आणि त्यांचे विचार हे आजच्या पिढीला प्रेरणादायी असून स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी घेतलेले अथक परिश्रम, त्यांनी केलेला त्याग, समर्पण आणि त्यांचे विचार हे तरुण पिढीला आत्मसात करण्याची गरज आहे, असे मत व्याख्याते योगेश सुपेकर यांनी मांडले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रबोधनपर्वाचे आयोजन चिंचवड, छत्रपती संभाजीनगर येथील कमलनयन बजाज शाळेजवळील मैदानात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी महापौर मंगला कदम, साईकिरण मित्र मंडळाचे पदाधिकारी, सभासद यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तरुण पिढीला सखोल मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आजच्या तरुण पिढीने जवळचा किंवा सोपा मार्ग न वापरता चोख पद्धतीने कोणतेही काम करायला हवे तसेच त्यांच्यात संयम असणे देखील महत्वाचे आहे.

आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोनला अनन्य साधारण महत्व आले असून मुलांना मोबाईलचे व्यसन लागत आहे. पालकांनी मुलांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तके वाचनाची आवड निर्माण करायला हवी, तसेच तरुण पिढीमध्ये आपली संस्कृती तेवत ठेवण्यासाठी गड किल्ल्यांवर सहल काढून त्याचा इतिहास त्यांना पटवून द्यायला हवा असे मत योगेश सुपेकर यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी स्वत:च्या युक्तीने जशी वाईट वृत्ती, वाईट प्रवृत्ती नष्ट केली तशी आपण स्वतः आपल्यातील गर्व, स्वतः मधील वाईट वृत्ती नष्ट करायला हवी तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन मानसिक ताणतणावातून मुक्त व्हायला हवे असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments