पुणे –
– खासगी बस चालकांकडून प्रवाश्यांची होणारी “लूट” थांबविण्याबाबत / प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कडक कारवाई चे आदेश देणेबाबत.एक निवेदन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना दिले आहे.
सुट्ट्यांचा हंगाम सुरु झाला की नागरिकांना मूळ गावी जाण्याचे किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा पर्यटनाला जाण्याचे वेध लागतात. ह्या काळात रेल्वेला असलेली गर्दी, प्रतीक्षा यादी बघता सामान्य नागरिक हा खासगी प्रवासी बस द्वारे प्रवासाला प्राधान्य देतो.
मात्र नेमकी प्रवाश्यांची ही गरज ओळखून खासगी बस मालक प्रचंड भाडेवाढ करतात आणि ग्राहकांची पिळवणूक करतात.आज ऑनलाईन बुकिंग साठी वेबसाईट तपासली असता पुणे ते हैद्राबाद, इंदूर, बैंगलोर,नागपूर यासह विविध ठिकाणी प्रवासाला जाण्याचे आजचे दर आवाक्यातील आणि हजार बाराशे असे असल्याचे दिसून येते तर सुट्टीच्या काळात मे महिन्याचे दर हे दुप्पट / तिप्पट असल्याचे दिसून येते.
प्रादेशिक परिवहन अधिकारी ( RTO ) याकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करतात आणि सर्वज्ञात कारणांनी ह्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यास धजावत नाहीत. नागरिक अथवा स्वयंसेवी संस्थांनी थोडा आरडाओरडा केला तर जुजबी कारवाई करताना दिसतात. मात्र कडक कारवाई करून याला आळा घालण्याचा आर. टी. ओ. चा कोणताही मानस दिसून येत नाही.
ही परिस्थिती पाहता सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने आपण त्वरित प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात तसेच वेळप्रसंगी आपण स्वतः खासगी बस मालक चालकांची बैठक घेऊन त्यांना ह्या पिळवणुकीबाबत जाब विचारावा अशी आग्रही मागणी करत आहे.आपण ह्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने बघाल आणि केवळ पुणेकरांनाच नव्हे तर राज्यातील नागरिकांना दिलासा द्याल याची खात्री वाटते.


