*
*ठाणे,दि.10(जिमाका):-* सध्या देशात असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी प्रशासनातील सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी सुरक्षित निवारागृहांची निवड करून ती सर्व सोयीसुविधांनी सज्ज ठेवण्याचे तसेच नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश दिले. यासोबतच सायरनची नियमित तपासणी करणे, जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणे निश्चित करून त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची तातडीने पाहणी करणे यावर त्यांनी विशेष भर दिला.
आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात सामाजिक संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेता, त्यांच्याशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. जीवनावश्यक वस्तू व साहित्याची यादी तयार करून पुरवठादारांची माहिती अद्ययावत ठेवण्यासोबतच, आपल्या विभागाशी संबंधित सर्व माहिती तातडीने अद्ययावत करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
“आता प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची वेळ आहे. देशासाठी आणि समाजासाठी एकजुटीने काम करण्याची ही वेळ आहे. सर्वांनी आपले कर्तव्य ओळखून पूर्ण तयारी करावी. जशी वेळ येईल, तसे आपले कर्तव्य बजावण्यासाठी मागेपुढे पाहू नका,” असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
त्यांनी पुढे सांगितले की, सर्वांना रजेवरून पुन्हा कर्तव्यावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले असून, आता ही आपल्या सर्वांच्या ‘परीक्षेची वेळ’ आहे, त्यामुळे प्रत्येकाने सर्व प्रकारे सज्ज राहावे.
या महत्त्वपूर्ण बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी आपापल्या विभागाच्या तयारीबाबत माहिती दिली आणि जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या बैठकीस अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सुनील पवार, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, सर्व प्रांताधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक विजय जाधव, महानगरपालिकांचे उपायुक्त, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.अनिता जवंजाळ, भारतीय भू-सेना व वायुसेनेचे प्रतिनिधी अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
एकंदरीत, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतलेली ही तातडीची बैठक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले निर्देश, जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
0000000