पुणे (ता २१): पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे थेट पाकिस्तानात घुसून दिलेले चोख उत्तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आहे. पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याने शत्रूच्या भूमीत जाऊन दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करत शेकडो आतंकवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईतून भारताची सैनिकी ताकद आणि निर्धार पुन्हा एकदा संपूर्ण जगासमोर अधोरेखित झाला आहे.
या ऐतिहासिक शौर्यगाथेला सलाम करण्यासाठी आज कसबा मतदारसंघात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. या यात्रेत मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. हातात तिरंगा आणि भारत माता की जय या घोषणेने संपर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी आमदार हेमंत रासने म्हणाले, “पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात 27 निष्पाप भारतीयांचा जीव गेला. हा हल्ला पाकिस्तानप्रेरित असून, त्याला भारतीय सैन्याने ठोस उत्तर देत शत्रूच्या भूमीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ लष्करी कारवाई नसून, ती भारताच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे. भारताचा कायम शांतता राखण्याचा प्रयत्न असतो, मात्र जर कोणी डिवचण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना प्रत्युत्तर देण्याची ताकद आपल्या सैन्याने दाखवून दिली आहे.”


