पुणे २५ मे – भारत देशाने साऱ्या विश्वाला संस्कृती, मूल्य, परंपरा,
शिक्षण, ज्ञान दिले आहे पण बदलत्या काळात या सर्व बाबी नव्याने संक्रमित करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी आज येथे व्यक्त केली.
आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याच कार्यक्रमात विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यंदाचा ब्राह्मण भूषण पुरस्कार पंचांगकर्ते मोहन दाते, इंदुमती – वसंत करिअर भूषण पुरस्कार युवा उद्योजक निर्मल देशपांडे, डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. किरण कुलकर्णी यांना तर भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्कार शुक्ल यजु:शाखीय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेला प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात “ब्राह्मण रत्ने” या चरित्रकोश ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे तसेच ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच “यशोगाथा – ब्राह्मण स्त्रियांची” या वंदना धर्माधिकारी लिखित पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पुरस्कार प्राप्त पंचागकर्ते मोहन दाते, कीर्तनकार किरण कुलकर्णी, युवा उद्योजक निर्मल देशपांडे, शुक्ल यजु:शाखीय संस्थेचे जगदीश नगरकर, उद्योजक हृषिकेश कुलकर्णी, सुनंदा निसळ तसेच संपादक भालचंद्र कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक संजय ओर्पे, संचालिका माधुरी कुलकर्णी उपस्थित होते.
यावेळी उद्योजक जितेंद्र सरदेसाई आणि रविंद्र देवधर यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला.
डॉ अभ्यंकर यांनी सांगितले की, येथून परदेशात शिक्षण, व्यवसाय अथवा नोकरीच्या निमित्ताने जाण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्याकडील ज्ञानाचे अधिष्ठान, संस्कृती, संस्कार ही मूल्ये वाढवण्याची गरज आहे.
उच्च तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी सांगितले की, संपूर्ण जगात भारत देश महासत्ता होण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याची गरज असून केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमात नव्यानं काही विषय समाविष्ट करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये पंचांग, वेद, योग, संगीत, कला यासारखे विषय जगासमोर
मांडण्याचा प्रयत्न आहे. मुख्य म्हणजे या सर्व विषयांची भाषा शैली सहज सोपी करण्याचा विचार आहे.
पुरस्काराला उत्तर देताना दाते यांनी सांगितले की, पंचाग निर्मितीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. त्यातही पॉकेट पंचांग, उपलब्ध करण्यात आले आहे. जेणेकरून त्याचा वापर अधिकाधिक प्रमाणात वाढावा हा हेतु आहे. आजच्या काळात कॅलेंडर असले तरी पंचांगाचे महत्व कमी होत नाही. कॅलेंडर हेडलाईन तर पंचांग हे हार्ट लाईन आहे असे ते म्हणाले.
संपादक भालचंद्र कुलकर्णी यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनमागाची भूमिका मांडली. व्यवस्थापकिय संचालक ओर्पे यांनी ग्रंथ निर्मिती आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या निर्मितीचा उद्देश सांगितला. कीर्तनकार किरण कुलकर्णी, जगदीश नगरकर, लेखिका वंदना धर्माधिकारी उद्योजक निर्मल देशपांडे, ऋषिकेश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला वैशाली जोशी यांनी इशस्तवन सादर केले तर संस्थेच्या संचालिका माधुरी
कुलकर्णी यांनी आभार मानले. वैशाली जोशी यांनी पसायदान सादर केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
———


