पुणे, १८ जुलै २०२५: “नोबेल विजेते आइंस्टाईन म्हणाले होते की ‘सत्य म्हणजे विज्ञान’, तर टागोर म्हणाले होते की ‘विज्ञान म्हणजे सत्य’. पण मी MIT-WPU मध्ये आल्यावर म्हणेन – विज्ञान म्हणजे शांतताही आहे. भारत 2047च्या दिशेने वाटचाल करत आहे आणि त्या वाटचालीत विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष हेच खरे विकासाचे इंजिन ठरणार आहे,” असे स्पष्ट शब्दांत मत व्यक्त केले CSIR (वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद) च्या महासंचालक डॉ. एन. कलैसेल्वी यांनी.
त्या MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे सुरू झालेल्या राष्ट्रीय शास्त्रज्ञ गोलमेज परिषद (NSRTC 2025) च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, “आज विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलला आहे. ते केवळ नोकऱ्यांच्या शोधात नाहीत, तर स्टार्टअप्स उभारत आहेत, रोजगार निर्माण करत आहेत. ही ‘शांत क्रांती’ विज्ञानामुळेच शक्य झाली आहे आणि तिला आपण पुढे नेलं पाहिजे.” त्यांनी NSRTC सारख्या व्यासपीठाच्या भूमिकेवरही भर दिला.
“अशा व्यासपीठांमुळे तरुण पिढी आणि देशातील प्रमुख वैज्ञानिक यांच्यात थेट संवाद साधता येतो. मार्गदर्शन, नवविचार, आणि व्यापक दृष्टी या गोष्टींना चालना मिळते. नव्या पिढीने भारतीय संदर्भातील धाडसी आणि सर्जनशील कल्पनांनी वास्तव समस्यांवर उपाय शोधायला हवा.”
या तीन दिवसीय परिषदेत देशभरातील वैज्ञानिक, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ सहभागी होत असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), प्रगत साहित्य आणि प्रक्रिया (Advanced Materials & Processing), डिजिटल रूपांतरण (Digital Transformation), ऊर्जा व शाश्वतता (Energy & Sustainability), आणि आरोग्य सेवा, औषधनिर्माण व जैवतंत्रज्ञान (Healthcare, Pharma & Biotechnology) हे पाच मुख्य विषय चर्चेसाठी ठरवण्यात आले आहेत. तसेच नोबेल पुरस्कार कार्यावर आधारित विशेष सत्रांचाही समावेश आहे.
या प्रसंगी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान महर्षी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. पुरस्कार त्यांच्या कन्या डॉ. लीलावती नारळीकर यांनी स्वीकारला. त्या म्हणाल्या, “माझ्या वडीलांनी विज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयुष्यभर मेहनत घेतली. त्यांचं लोकांशी सहज जोडणं हे खूप खास होतं. आज ह्या पुरस्काराची रक्कम त्यांच्या स्वप्नाला जिवंत ठेवण्यासाठी करणार आहोत.”
पद्मश्री प्रा. डॉ. आशुतोष शर्मा (माजी सचिव, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार) यांनी विज्ञानाच्या मूळ मूल्यांवर प्रकाश टाकताना सांगितले,
“अशा परिषदेच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अनेक महत्त्वाचे पैलू एकत्र येतात. आज कोणतीही समस्या फक्त विज्ञान किंवा तंत्रज्ञान ह्या एकट्या घटकाने ने सोडवू शकत नाही. दोन्ही घटकांमध्ये मध्ये आपले भविष्य आहे. भारतातील प्रश्नांना त्याच्या परिस्थितीशी सुसंगत उत्तरं शोधावी लागतील. खरी शिकवण ही प्रत्यक्ष समस्यांवर काम करताना मिळते – आणि आता धाडसी आणि कल्पक विचारांची वेळ आली आहे. ”
कार्यक्रमाच्या स्वागतपर भाषणात डॉ. राहुल व्ही. कराड, कार्यकारी अध्यक्ष, MIT-WPU म्हणाले, “संशोधन हेच राष्ट्रीय विकासाचे अधिष्ठान आहे. आजही आपण GPS सारख्या तंत्रज्ञानासाठी परदेशावर अवलंबून आहोत. हे चित्र बदलण्यासाठी तरुणांनी संशोधनात पुढे यावं, यासाठीच NSRTC हे व्यासपीठ आहे.”
डॉ. विजय पी. भटकर (संस्थापक, C-DAC) यांनी तरुण वैज्ञानिकांच्या सहभागाचे कौतुक करत सांगितले, “विविध क्षेत्रांतील संशोधक, तरुण आणि तज्ञ या मंचावर एकत्र आले आहेत. हीच खरी क्रांती घडवणारी शक्ती आहे.”
संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, “ही परिषद केवळ तंत्रज्ञानापुरती नाही, तर विचार, शांती आणि सहकार्याच्या माध्यमातून देश घडवण्याचा एक प्रयत्न आहे.”
या परिषदेत ३६ शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार विजेते, INSA पुरस्कारप्राप्त वैज्ञानिक, देशभरातील प्रमुख संशोधन संस्था, विद्यापीठे, प्रयोगशाळांचे संचालक, तसेच अमेरिका व युरोपमधील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक सहभागी झाले आहेत.
पुढील दोन दिवसांमध्ये विविध सत्रं, व्याख्यानं आणि संवादाद्वारे भारताच्या वैज्ञानिक भविष्यासाठी नव्या कल्पना आणि सहकार्याला दिशा मिळणार आहे.
**********


