पुणे, दि. १४ फेब्रुवारी: पुणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन येत्या १५ फेब्रुवारी २०२४ रोजी आहे. त्या पार्श्वभूमीवर कामगार कल्याण विभागामार्फत दरवर्षी प्रमाणे सांस्कृतिक कला मंचच्या माध्यमातून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचा-यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये वसंत सबनीस लिखीत आणि मंगलदास माने दिग्दर्शीत “घरोघरी हीच बोंब” हे नाटक सादर केले जाणार आहे. गुरुवार दि. १५ फेब्रुवारी रोजी दुपारी २:०० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे हा नाट्यप्रयोग होणार असून प्रवेश विनामूल्य आहे.
लग्न म्हणजे बेडी, बंधन, स्वातंत्र्य हिरावून घेणारा संस्कार नसून जीवन तत्वज्ञानाचा अनुभव देणारा संस्कार आहे. दिग्दर्शकाने तरूणाईची मानसिकता दाखवली आहे. सोबतच या तरूणाईस दिशा दाखवणारा असल्यास त्यांच्या आयुष्याचेही सोने होते, तेही जबाबदारी घेण्यास तयार आहेत, त्यांच्यातही परिपक्वता आहे, हा संदेश दिग्दर्शकाने या नाटकात देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेम आणि लग्न कधीच करायचं नाही ही प्रतिज्ञा मोडत नाटकांतील पात्र चक्क प्रेमात पडतात आणि लग्नही करतात. वैवाहिक आयुष्यात आलेले वादळ परतावून ते सुखी आयुष्याची मुहूर्तमेढ रोवतात. ‘लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही आणि प्रेमाची भानगड करायची नाही’ या तत्वज्ञानापासून जीवनाचा, लग्नसंस्काराचा अर्थ उलगडण्यापर्यंतचा प्रवास ‘घरोघरी हीच बोंब’ या नाटकात विनोदी व मिश्किल शैलीत उलगडण्यात येणार आहे. म्हणून ४७ वर्षानंतरदेखील आजही हे नाटक सदाबहार आहे.
या नाटकामध्ये आदर्श गायकवाड, चेतन गरुड, हेमांगी काळे, मयुरी कुचेकर, अंजली जाखडे, आकाश होळकर आणि मंगलदास माने यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमाची निर्मिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, प्रशासन अधिकारी राजेश कामठे यांनी केली असून या करीता कामगार युनियन, पीएमसी एम्प्लाँयीज युनियन, महापालिका सहआयुक्त यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
================================


