पुणे,29 जुलै 2025 : फिक्की एफएलओ पुणे ने आयुजेन बायोसायन्सेस आणि रोश डायग्नोस्टिक्सच्या सहकार्याने गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या जागृतीसाठी शील्ड हर फ्युचर – सर्व्हायकल फोरम 2025 या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथील सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजीच्या उप -संचालिका डॉ.गौरवी मिश्रा ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी फिक्की एफएलओच्या अध्यक्ष अनिता अगरवाल,आयुजेन बायोसायन्सेसचे संचालक मनिष पुंगलिया आदी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर सर्व्हायकल कॅन्सर या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये स्त्रीरोग व कर्करोग तज्ञ डॉ.हर्षद पारसनीस, स्त्रीरोग तज्ञ व पीओजीएसचे माजी उपाध्यक्ष डॉ.मिलिंद दुगड, माजी अध्यक्ष डॉ.आरती निमकर, मॉलेक्युलर जेनॉमिक्स तज्ञ मनिष पुंगलिया यांनी सहभाग घेतला. या चर्चासत्राचे समन्वयन रोश डायग्नोस्टिक्सच्या मेडिकल अफेअर्स विभागाचे प्रमुख डॉ.संदीप सेवलिकर यांनी केले.
डॉ.गौरवी मिश्रा म्हणाल्या की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे नेमके कारण,त्याचे निदान व उपचार कसे करायचे हे आपल्याला माहित आहे. तरीही जगभरातील गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या रूग्णांपैकी 20 टक्के रूग्ण हे भारतात आढळतात. दरवर्षी भारतात 1.3 लाख महिलांमध्ये या कर्करोगाचे निदान होते. त्यापैकी अनेकांचा कर्करोग पुढच्या टप्प्यात असतो.खरंतरं हा कर्करोग टाळता येतो किंवा बरा करता येतो.
त्यापुढे म्हणाल्या की, उच्च जोखमीचा असलेला कर्करोगग्रस्त एचपीव्ही विषाणूचा सतत संसर्ग गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे मुख्य कारण आहे. प्रारंभी काही लक्षणे दिसून येत नाहीत,परंतु नंतरच्या टप्प्यात दोन मासिक पाळींमध्ये सतत रक्तस्त्राव,शारीरिक संबंधांनंतर रक्तस्त्राव,रजोनिवृत्तीनंतर रक्तस्त्राव इत्यादी लक्षणे दिसून येऊ शकतात. वयाच्या तीस वर्षापासून नियमित तपासणी गरजेची आहे,जेणे करून कर्करोगपूर्व किंवा प्राथमिक टप्प्यातच याचे निदान व उपचार होऊ शकतात.
डॉ.आरती निमकर म्हणाल्या की, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग बरा होऊ शकत नाही हा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. वेळेवर निदान व उपचाराने गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग बरा होऊ शकतो.
डॉ.मीनू अगरवाल यांनी महिलांसाठीही नियमित तपासणी आवश्यक असल्याचे सांगितले.
पुढील टप्प्यातील लक्षणांबद्दल सविस्तर माहिती देताना डॉ.मिलिंद दुगड म्हणाले की,लस घेतल्यानंतरही वयाच्या तिशीनंतर नियमित तपासणी करणे योग्य ठरेल.
मार्गदर्शक सूचनांबद्दल बोलताना हर्षद पारसनीस यांनी निदान पध्दतींबाबत माहिती दिली.ते म्हणाले की, पॅप चाचणीमध्ये पेशींमधील बदलांबाबत निदान केले जाते,तर एचपीव्ही चाचणीमध्ये विषाणूबाबत निदान केले जाते.दोन्ही जर निगेटिव्ह आले तर पुढची चाचणी 5 वर्षांनी करता येते.
आयुजेन बायोसायन्सेसचे संचालक मनिष पुंगलिया म्हणाले की, अद्ययावत वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या युगामध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू होणे ही दुर्दैवी बाब आहे.हा कार्यक्रम फक्त जागरूकतेसाठी नव्हे तर हा संदेश पुढे घेऊन जाण्यासाठी आहे.
फिक्की एफएलओच्या अध्यक्ष अनिता अगरवाल म्हणाल्या की,एफएलओ ही फिक्कीची महिलांची शाखा असून भारतभर 21 शाखा आहेत. फिक्की एफएलओ तर्फे शिक्षण,ग्रामीण रोजगार,शाश्वतता आणि इतर विषयांवर उपक्रम हाती घेतले जातात.
—


