Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedगजानन मेहेंदळे जागतिक दर्जाचे इतिहास संशोधक होते - कृष्णगोपाल

गजानन मेहेंदळे जागतिक दर्जाचे इतिहास संशोधक होते – कृष्णगोपाल

 

 

पुणे, ९ नोव्हेंबर – गेल्या सुमारे एक हजार वर्षात भारतावर असंख्य आक्रमणे झाली, ज्यात असंख्य राष्ट्रभक्तांचे बलिदान झाले. त्यातूनही भक्कमपणे दिमाखाने उभे राहणाऱ्या आपल्या भारताचे सर्वांगीण संशोधन सातत्याने होण्याची गरज आहे, ज्यासाठी गजानन मेहेंदळेंसारखे संशोधक तयार व्हावेत, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी यांनी आज येथे व्यक्त केली.

 

ज्येष्ठ इतिहास संशोधक व शिवचरित्रकार गजानन भास्कर तथा गजाभाऊ मेहेंदळे यांचे 17 सप्टेंबर 2025 रोजी अकस्मात दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी आज स्मृती संकल्प सभेचे येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह कृष्णगोपालजी, इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्चचे (आयसीएचआर) अध्यक्ष रघुवेंद्र तंवर, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, सचिव पांडुरंग बलकवडे, खजिनदार नंदकुमार निकम व डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना कृष्णगोपालजी यांनी गजाभाऊ मेहेंदळे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. इतिहासातील सत्य बाहेर आणण्यासाठी आयुष्यभर धडपड करणारा हा माणूस अद्वितीय होता. गजाभाऊंचे संशोधनाचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी इतिहासाचा धांडोळा घेतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कामगिरीचे पैलू त्यांनी उलगडून दाखवले. आपल्या देशाची, इतिहासाची आणि आपल्या संस्कृतीची प्रतिमा वाईट करण्याचे काम इंग्रजांनी जाणीवपूर्वक केले. भारताला ख्रिश्चन करण्याचे त्यांचे षडयंत्र आपल्या थोर पराक्रमी महापुरुषांनी हाणून पाडले. त्यावर विस्तृतपणे सखोल संशोधन होण्याची गरज आहे. इतिहासाचे संशोधन फक्त राजा, साम्राज्य इथपर्यंतच अपेक्षित नसून देशातील विविध मुद्यांचा सर्वांगीण बाजूने वेध घेता आला पाहिजे, म्हणजे संशोधन परिपूर्ण होऊ शकेल.

 

यावेळी तंवर म्हणाले की, इतिहास संशोधन हा कधीही न संपणारा विषय आहे. कोणतेही साहित्य, इतिहास जोपर्यंत इंग्रजीत प्रसिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याची देशपातळीवर दखल घेतली जात नाही, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. गजाभाऊंच्या अप्रकाशित पुस्तकांसाठी आयसीएचआर देखील सहकार्य देण्यास तयार आहे.

 

गजाभाऊंच्या आठवणींना उजाळा देताना प्रदीप रावत यांनी भारत इतिहास संशोधक मंडळात गजाभाऊंच्या नावाने “गजानन मेहेंदळे मराठा इतिहास अध्यासन केंद्र” स्थापन करण्याची घोषणा केली. या अध्यासनात मराठा साम्राज्यातील शस्त्रास्त्रे, युध्दकौशल्य आणि दस्तऐवज यांची सर्व माहिती उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच इतिहास संशोधनासाठी सुरुवातीला एक लाख रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. नजीकच्या काळात त्यांनी संशोधित करून ठेवलेल्या अत्यंत महत्वाच्या ऐतिहासिक साहित्याच्या प्रकाशनाचा संकल्प यावेळी करण्यात येत असून येत्या वर्षभरात गजाभाऊंचे अप्रकाशित साहित्य ज्यात भारतावरील इस्लामिक आक्रमणांचे सर्व खंड, दुसरे महायुद्ध याचे पाच खंड प्रकाशित केले जाणार आहेत.

 

गजानन मेहेंदळे यांनी युद्धशास्त्र या विषयाचा सखोल अभ्यास केला होता. 1971 च्या बांगलादेश युद्धातही त्यांनी युद्ध वार्ताहर म्हणून काम केले होते. शिवचरित्र, आदिलशाही फर्माने, शिवरायांचे आरमार, टिपू सुलतान, इस्लाम तसेच अन्य विषयांवर त्यांनी विस्तृत व सप्रमाण लेखन केले आहे. इतिहास विषयाचा चालता बोलता कोश अशीच गजानन मेहेंदळे यांची ओळख होती. अशा अनंत आठवणींना या स्मृती संकल्प सभेमध्ये उजाळा देण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन निकम यांनी केले तर बलकवडे यांनी सर्वांचे आभार मानले. येत्या २० नोव्हेंबर रोजी सायं. ५.३० वाजता भारत इतिहास संशोधक मंडळात सर्वांच्या भावना व्यक्त करण्यासाठी स्वतंत्र श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बलकवडे यांनी यावेळी दिली.

——

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments