Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedबीएनसीएच्या पर्यावरण विभागातील विद्यार्थिनी मानसी मोकाशीचा राष्ट्रीय गौरव कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या शोधनिबंध...

बीएनसीएच्या पर्यावरण विभागातील विद्यार्थिनी मानसी मोकाशीचा राष्ट्रीय गौरव कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या शोधनिबंध स्पर्धेत देशात सर्वप्रथम, दोघी उपविजेत्या

पुणे, दि.11 : ‌‘शहरातील उष्ण क्षेत्रांच्या अभ्यासाबरोबर तेथील तापमान प्रतिरोधन रणनीती विकसित करण्यासाठी पुणे शहराच्या उष्णता कृती योजनेवर आधारीत पायाभूत सुविधा सुचवण्याचे काम‌’ शोधनिबंधा द्वारे एका पुणेकर विद्यार्थिनीने केले आहे. महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) पर्यावरण विभागातील पदव्यूत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेली मानसी मोकाशी ही ती विद्यार्थिनी आहे.

 

वास्तू रचनाशास्त्रातील देशपातळीवरील सर्वोच्च संस्था असणाऱ्या कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या (सीओए) राष्ट्रीय पातळीवरील शोधनिबंध स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर वास्तूरचना शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमातील सर्वोत्तम शोध निबंध म्हणून मानसीला नुकतेच गौरवण्यात आले. याशिवाय बीएनसीएच्या आणखी दोन विद्यार्थिनींनाही याच स्पर्धेत उपविजेते म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये पर्यावरण विभागातील तेजश्री पिसे आणि डिजिटल आर्किटेक्चर विभागातील देवश्री बावसकर यांचा समावेश आहे.

 

‌‘सीओए‌’तर्फे आयोजित केलेल्या स्पर्धेतून देशपातळीवर सर्वोत्तम ठरलेल्या निबंधामुळे मानसीला एक लाख रूपयांचा पुरस्कार व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आला. तसेच तेजश्री आणि देवश्री यांना प्रत्येकी 25 हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. अहमदाबादमधील निरमा विद्यापीठातील एका समारंभात हे पुरस्कार नुकतेच प्रदान करण्यात आले. मानसीला बीएनसीएच्या पर्यावरण विभागातील प्रा. डॉ. प्राजक्ता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाल, तर तेजश्री आणि देवश्री यांना अनुक्रमे बीएनसीएतील पर्यावरण विभाग प्रमूख डॉ. सुजाता कर्वे आणि डिजिटल विभागातील प्रा. सुप्रिया ढमाले आणि डिजिटल विभागप्रमूख प्रा. धनश्री सरदेशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले.

 

बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी मानसी, तेजश्री आणि देवश्रीचे अभिनंदन केले आहे. डॉ. कश्यप म्हणाले की, शाश्वत शहरी विकासाची तत्त्वे डोळ्यांपुढे ठेवूनच या संशोधनात उष्णता नियंत्रणवरील उपाय मानसीने तिच्या शोधनिबंधात सुचवले आहेत. तसेच राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरण आणि संयुक्त राष्ट्रसंघाने सुचवलेल्या 17 शाश्वत उद्दीष्टांनुसार कृती आराखडा तयार केला आहे. याचा पुणे महापालिकेला निश्चित उपयोग होईल.

 

मानसीच्या मार्गदर्शक डॉ. प्राजक्ता कुलकर्णी म्हणाल्या की, जागतिक तापमानवाढ आणि वेगाने होत चाललेल्या शहरीकरणामुळे पुण्यात वेळोवळी निर्माण होत असणाऱ्या उष्णतेच्या लाटांमधून शहरातील काही विशिष्ट भागात निर्माण होणारी उष्णतेची बेटं शोधून काढणे शक्य झाले आहे. यासाठी विविध शास्त्रशुद्ध परिमाणांचा वापर केला असून त्यातून शहरातील घनदाट बांधकामांची ठिकाणे, तसेच त्यामधील उष्णता शोषून घेणाऱ्या बांधकाम साधनांमुळे औष्णिक तीव्रता वाढत जाते. या संशोधनातून पुणे शहरात उष्णतेचे नियंत्रण करण्यासाठी एक आकृतीबंध सुचवण्यात आला असून शहरात उष्णता निर्माण होणारी व वाढणारी ठिकाणे तसेच स्थानिक पातळीवर या समस्येवर उपाय शोधताना तिथे थंडावा निर्माण करण्याचे उपायही सुचवले आहेत.

 

तेजश्री हिचा संशोधनाचा विषय ‌‘संयुक्त विकास नियंत्रित आणि विकाससंचाचा (यूडीसीपीआर) पुणे शहरातील पर्यावरणीय शाश्वतवर होणारा परिणाम‌’ असा असून देवश्रीने ‌‘मिश्र उत्पादन तंत्रज्ञानातून वाळूचा त्रिमिती छपाई साठी वापर‌’ या विषयांवरील शोधनिबंध सीओएच्या स्पर्धेत सा

दर केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments