पुणे, दि. १३ नोव्हेंबर (जिमाका, वृत्तसेवा): श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी (कार्तिकी यात्रा) सोहळाच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्यासह स्वयंपाकाकरीता वापरण्यास मनाई करण्यातबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
या आदेशानुसार इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासह स्वयंपाकाकरीता वापरण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे तथापि, ते पाणी भांडी घासणे वा तत्सम अन्य कारणासाठी वापरता येईल. तसेच आळंदीतील ठिकठिकाणी असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे. इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणतीही कपडे धुवू नयेत, अगर कोणत्याही प्रकारे नदीचे पाणी दूषित होईल असे कृत्य करु नये. सदर दूषित पाणी पिल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम १३१ प्रमाणे कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी आदेशात नमूद केले आहे.
०००००


