भांडारकरांचे विचार भारतासह जगभरातील लोकांचे मन उन्नत करू शकतात
अच्युत गोडबोले , डॉ अभिजीत व डॉ मनीषा सोनवणे-‘डाॅक्टर्स फाॅर बेगर्स’, नेत्रा पाटकर-झेप संस्था यांना प्रार्थना समाजाचे पुरस्कार प्रदान
पुणे प्रार्थना समाज वार्षिकोत्सव : संस्थेचे १५६ व्या वर्षात पदार्पण
पुणे : आज सर्वत्र धर्माच्या बाह्यरूपाचा गाजावाजा होताना दिसतो,परंतु धर्माचा गाभा, अध्यात्म, नैतिक मूल्ये यांचा मोठ्या प्रमाणावर अभाव दिसून येतो. त्यामुळे रामकृष्ण गोपाळ भांडारकर विचार आजही अत्यंत महत्त्वाचे ठरतात. समाजरचना, सामाजिक बदल, धर्माचा खरा अर्थ, अध्यात्म या विषयीचे त्यांचे विचार महत्त्वाचे आहेत. म्हणूनच भांडारकरांचे विचार आजही जिवंत आहेत आणि ते भारतासह जगभरातील लोकांचे मन उन्नत करू शकतात, असे मत ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ पद्मश्री डाॅ. के. पद्दय्या यांनी व्यक्त केले.
पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेच्या वार्षिकोत्सवानिमित्त डाॅ. के. पद्दय्या यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदिया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा झाला. संस्थेचे सचिव डॉ. दिलीप जोग, डाॅ. सुषमा जोग यावेळी उपस्थित होते. डॉ. शिल्पा मुजुमदार यांनी सूत्रसंचालन केले. आर्कि.नमिता मुजुमदार यांनी सुरुवातीस ईश्वरोपासना चालवली.
अच्युत गोडबोले, डाॅ. अभिजीत सोनवणे आणि डाॅ. मनीषा सोनावणे, डाॅक्टर्स फाॅर बेगर्स ,यांच्या सोहम संस्थेला आणि नेत्रा पाटकर यांच्या झेप संस्थेला यंदाच्या वार्षिकोत्सव सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अच्युत गोडबोले यांना डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. अभिजीत सोनवणे व डॉ. मनीषा सोनवणे यांच्या ,’डॉक्टर्स फॉर बेगर्स’,सोहम ट्रस्ट या संस्थेला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्काराने तर ‘झेप रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर स्पेशल चिल्ड्रन’ या संस्थेच्या संस्थापिका नेत्रा पाटकर यांना डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रुपये २५ हजार रुपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे तीनही पुरस्कारांचे स्वरूप होते.
के.पद्दय्या म्हणाले, रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे आधुनिक भारतातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. ते प्राचीन भारताचे महान अभ्यासक होते, पण त्यांना हे ठाऊक होते की प्राचीन भारताचे विद्वत्तापूर्ण ज्ञान हे आजच्या समाजाच्या उत्कर्षासाठी वापरले गेले पाहिजे. १९व्या शतकाच्या अखेरपासूनच भांडारकरांनी विद्वत्तेचा उपयोग समाजपरिवर्तनासाठी केला. त्यांनी सामाजिक सुधारणा चळवळीत सहभाग घेतला, समाजातील अनावश्यक प्रथांचा विरोध केला आणि खऱ्या धर्माची मूळ भावना म्हणजे अध्यात्म हे पटवून सांगितले. याच विचारातून प्रार्थना समाजाचा उदय झाला.
डॉ. दिलीप जोग म्हणाले, हल्ली सर्वत्र ‘सनातन धर्म’ म्हणून मोठा गाजावाजा केला जातो. पण खरा सनातन धर्म हा ब्राह्मो समाज आणि प्रार्थना समाजाचा आहे. येथे परब्रह्माची उपासना केली जाते. प्रार्थना समाजाची पंचसूत्री स्वीकारली, तर समाजातील सर्व भेदाभेद दूर होतील. ही पंचसूत्री म्हणजे मानवतावादी व्हा,समानता वादी व्हा,आध्यात्मिक व्हा,सत्कर्म करत राहा,आणि वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा. ही पंचसूत्री नेत्यांसह प्रत्येकाने अंगीकारून आचरणात आणायला हवी.
—


