पुणे : साने गुरुजींनी माणसांची मने जोडण्याचे काम केले. त्यांनी प्रेमाचा धर्म सांगितला. आंतरभारतीची संकल्पना मांडून भारतीय भाषा शिकण्याची गरज विशद केली. राष्ट्रीय एकात्मतेतूनच बलशाली भारत घडेल. माणुसकीचा, प्रेमाचा धर्म हाच भारताला तारणारा धर्म आहे. जात, धर्म, द्वेष, मत्सर याच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून एकमेकांशी वागायला हवे, असे मत साहित्यिका शुभांगी कोपरकर यांनी व्यक्त केले.
“करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे’ या साने गुरुजींच्या विचारांना अभिवादन करत आदिश जैन फाउंडेशन यांच्या वतीने साने गुरुजी जयंतीनिमित्त बालकांसाठी साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव पेठेतील अक्षरवेल सभागृहात करण्यात आले होते. यावेळी कवी म.भा. चव्हाण, संस्थेच्या अध्यक्ष मृणाल जैन, विश्वस्त हेमंत जैन
,फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, सल्लागार, अनेक कवी-कवयित्री व रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
म. भा. चव्हाण म्हणाले, श्यामची आई हे पुस्तक पुणे विद्यार्थी गृह ला प्रकाशित करण्याची संधी मिळाली. त्यातून संस्थेची इमारत उभी राहिली. साने गुरुजी राष्ट्रपुरुष होते. त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला – श्यामची आई हे पुस्तक म्हणजे संस्काराची गंगोत्री आहे. भाषा, जात, धर्म, प्रांत यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी प्रेमाचा संदेश दिला. भारतीय संस्कृती त्यांनी आपल्या आचरणातून शिकवली.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात पुणे विद्यार्थी गृहातील ४४ विद्यार्थ्यांनी २७ प्रकारांतील कला सादर करत देशभक्ती, संस्कृती व साने गुरुजींचे विचार प्रभावीपणे मांडले.
द्वितीय सत्रात बालसाहित्यावर आधारित निवडक कवितांचे सादरीकरण झाले. या सत्राचे सूत्रसंचालन ज्ञानसेतूचे कार्याध्यक्ष विजय सातपुते व साहित्य सेतूच्या कार्याध्यक्ष राजश्री सोले यांनी केले.
संस्थेचे ट्रस्टी हेमंत जैन यांनी प्रास्ताविक केले. संस्थेच्या अध्यक्षा मृणाल जैन यांनी आभा
र मानले.


