पुणे : शहराच्या विकासाबद्दल नागरिकांना सांगण्यासाठी भाजपकडे काही उरलेले नाही. देशातील शंभर स्मार्ट सिटी दुर्बिण घेऊनही आता दिसत नाहीत. भाजपचे नेते इमारतींचा पुनर्विकास, टक्केवारी यातच गुंतले आहेत, असा जोरदार हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. मी मारायचे सोंग करतो, तू रडायचे सोंग कर, अशी नुरा कुस्ती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुरू आहे. हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी सडकून टीका त्यांनी केली.
महर्षीनगर, मुकुंदनगर, सॅलिसबरी पार्क, लुल्लानगर या प्रभाग क्रमांक २१मधील काँग्रेसचे उमेदवार अक्षय अनिलकुमार जैन, योगिता भरत सुराणा, डॉ. स्नेहलता पाडळे, पुष्कर प्रसाद आबनावे यांच्या प्रचारासाठी सपकाळ यांची मुकुंदनगर येथे सभा झाली. या सभेत सपकाळ यांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. या वेळी प्रदेश काँग्रेसचे खजिनदार अॅड. अभय छाजेड, प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी, अमिर शेख, भाऊसाहेब आसबे, चंदू माने, अनुसुया गायकवाड, सुरेश चौधरी, उमेदवार अक्षय अनिलकुमार जैन, योगिता भरत सुराणा, डॉ. स्नेहलता पाडळे, पुष्कर प्रसाद आबनावे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
कोयता गँगच्या माध्यमातून गुंडांना पाठीशी घातले जात आहे. पुण्यात जमिनी हडपण्याचे प्रकार सुरू आहेत. पाठीत खंजिर खुपसणाऱ्या पुतण्याला सत्तेत घेऊन भाजप त्याच्यावरच टीका करत आहे. जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्र्याच्या मुलाला वाचविण्यात आले. देवा भाऊ लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देऊन केसाने गळा कापत आहे. तो देवा भाऊ नसून, मेवा भाऊ आहे,’ अशी घणाघाती टीका सपकाळ यांनी महायुतीच्या नेत्यांवर केली.
पैसा फेको आणि तमाशा देखो’ अशी भाजपची निती झाली आहे. सत्तेत एकत्र असलेले पक्ष स्थानिक निवडणुकीत एकमेकाविरोधात टीका करून लोकांची दिशाभूल करत आहेत. सत्ताधाऱ्यांची ही नुरा कुस्ती ओळखून त्यांना सत्तेत खाली खेचण्याची वेळ आली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे विचार बाजूला सारले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
मलिदा लाटताना एकत्र व शिव्या देताना वेगळे अशी भूमिका अजित पवारांनी घेतली आहे. स्वाभिमान शिल्ल्क असल्यास अजित पवारांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान सपकाळ यांनी दिले. पुण्यात पाणीपुरवठा, साफसफाई, वाहतूक हे मुद्दे महत्त्वाचे असताना निवडणूक भलत्याच मुद्द्यांवर लढवली जात आहे. जाती-धर्मांत तेढ निर्माण करण्याचे काम सत्ताधारी करीत आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देऊन सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असे टीकास्त्र त्यांनी सोडले.
शहराच्या विकासासाठी काँग्रेस आघाडीला मत द्या. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याची काँग्रेसची विचारधारा आहे. विकास आणि कायदा सुव्यवस्था तसेच सोयीसुविधा आणि चांगल्या नागरी जीवनासाठी नागरिकांनी काँग्रेसच्या हाताला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.


