पुणे : संघावर करण्यात येणाऱ्या आरोपांपैकी एक महत्त्वाचा आरोप म्हणजे संघ हे केवळ ब्राह्मणांचे संघटन आहे, असा पसरवलेला गैरसमज. आजही अनेक गावांमध्ये हा समज आढळतो. प्रत्यक्षात संघाचे कार्य हे संपूर्ण समाजासाठी असून, संघामध्ये सर्व जाती–धर्मांचे कार्यकर्ते सुरुवातीपासूनच कार्यरत आहेत. महात्मा गांधींच्या हत्येनंतर समाजात ब्राह्मणद्वेष उफाळून आला आणि त्याचा फटका संघालाही बसला. नथुराम गोडसे आणि गांधीहत्येशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कोणताही संबंध नव्हता, तरीही २०१४ पर्यंत संघाविरुद्ध अपप्रचार सुरूच राहिला. मात्र आज परिस्थिती बदलली असून, अठरापगड जातींचे कार्यकर्ते संघात सक्रियपणे कार्यरत आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक आणि केंद्रीय कार्यकारणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी व्यक्त केले.
श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेचा वार्षिक महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुहास हिरेमठ यांचे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : आक्षेप आणि वास्तव’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत, संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते.
सुहास हिरेमठ म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रसारमाध्यमे व काही राजकीय प्रवाहांकडून सातत्याने अपप्रचार केला गेला आहे. अनेक वेळा स्वतः संघात सहभागी होता न आल्यामुळे किंवा वैचारिक मतभेदांमुळे संघावर टीका केली जाते. राजकीय स्वार्थासाठी मतपेटीच्या गणितात, संघाला लक्ष्य केले जाते. त्यामुळे संघावरील जुने आरोप आता कालबाह्य ठरत आहेत. संघाबाबत आणखी एक गैरसमज म्हणजे संघात महिलांना स्थान नाही किंवा संघ महिला-विरोधी आहे. प्रत्यक्षात उत्कृष्ट आणि संस्कारित माणसे घडवणे हे संघाचे प्रमुख कार्य आहे. याच विचारातून १९३६ साली राष्ट्रसेविका समितीची स्थापना करण्यात आली. आज अनेक कार्यक्रमांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती अधिक असते, हे संघाच्या कार्याचा जिवंत पुरावा आहे.
ते पुढे म्हणाले, ब्रिटिशांनी हिंदू समाजाला एका सांप्रदायिक चौकटीत अडकवण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम आणि ख्रिश्चन हे एकेश्वरवादी धर्म आहेत; त्यांची ठराविक देवकल्पना, एक ग्रंथ आणि एकसंध उपासना पद्धती आहे. मात्र हिंदू समाज तसा नाही. हिंदू हा एक देव, एक पूजा पद्धत किंवा एक ग्रंथ यापुरता मर्यादित नाही. हिंदू समाजात देवपूजा करणारेही हिंदू आहेत आणि देवपूजा न करणारेही हिंदू आहेत. धर्म आणि संप्रदाय यामध्ये मूलभूत फरक आहे. संप्रदाय विशिष्ट श्रद्धा व उपासना पद्धतींवर आधारित असतो, तर हिंदू ही केवळ धार्मिक ओळख नसून एक व्यापक राष्ट्रीय ओळख आहे. हिंदू हा शब्द पूजा पाठाशी संबंधित नाही तर ते राष्ट्रीयत्व आहे.
जगन्नाथ लडकत यांनी सुहास हिरेमठ यांचा परिचय करून दिला.


