पुणे ः पालकांच्या अति-रक्षणामुळे मुलांमध्ये छोट्या समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता कमी होत आहे. या आव्हानावर मात करण्यासाठी गिर्यारोहण अत्यंत उपयुक्त ठरते. चढ उतार करताना मुलं केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम होत नाहीत, तर जीवनातील चढ उतार पचवण्याची मानसिक ताकदही विकसित करतात आणि स्वतःच्या क्षमतेची जाणीव करून घेतात, असे मत गिर्यारोहक उपेश झिरपे यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणेच्या वतीने पोवाडा प्रशिक्षण वर्गात सिंहगडावर सहस्त्रारोहण करणारा सह्याद्रीचा मावळा लक्ष्मीकांत सासवडे यांचा विशेष सन्मान हस्ते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रबोधनाचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे, अरुणकुमार बाभुळगावकर, शाहीर गणेशदादा टोकेकर, आप्पा वनकर आदी उपस्थित होते. रमणबाग प्रशालेतील कलाग्राम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
उमेश झिरपे म्हणाले, आज सिंहगडावर लोक केवळ पिठलं-भाकरी खाण्यासाठी जातात. तिथे कोणाची समाधी आहे, याची देखील माहिती अनेकांना नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक गड-किल्ला शौर्याचे प्रतीक आहे. त्या भूमिची पवित्र माती मस्तकी लावा, असेही त्यांनी सांगितले.
लक्ष्मीकांत सासवडे म्हणाले, आपण स्वतः जेव्हा गडांची चढाई करतो, तेव्हा त्याचे सौंदर्य समजते. मी जेव्हा सिंहगडाची चढाई सुरू केली, तेव्हा प्रत्येक वेळी त्याचे नव्याने सौंदर्य मला दिसले. अनेक अडचणी आल्या, परंतु त्या पार करत मी पुढे गेलो. आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण हा देश पाहत आहोत. मुलांनी फक्त अभ्यासात नाही, तर प्रत्यक्षात त्यांचा इतिहास अनुभवण्यासाठी गड चढले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, वेड पांघरल्याशिवाय इतिहास घडत नाही. तुमच्यात असे वेड असले पाहिजे जे समाजाला प्रेरणा देईल. या भावनेतून प्रेरित होऊन, लक्ष्मीकांत सासवडे यांची प्रेरणा मुलांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रबोधिनीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ ऐतिहासिक ज्ञान नव्हे, तर समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देखील मिळेल, असे त्यांनी सांगितले.


