*६१ किलोत अजय कापडे, अमोल वालगुडे, विवेक धावडे, वैभव पाटील अंतिम फेरीत; ८६ किलोत अविनाश शिंदे, बिरुदेव बनसोडे, विकास कार्ये आणि सुरज माने यांची धडक*
*पुणे* : रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाउंडेशन आयोजित महाराष्ट्र केसरी या कुस्ती स्पर्धेत आज झालेल्या माती आणि गादी विभागातील उपांत्य फेरीच्या लढतींनंतर विविध वजनी गटांतील अंतिम फेरीचे चित्र स्पष्ट झाले. ६१ किलो आणि ८६ किलो वजनी गटांतील सेमीफायनल लढतींमध्ये अनेक मल्लांनी एकतर्फी विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला, तर काही ठिकाणी चुरशीच्या लढतीही पाहायला मिळाल्या.
माती विभागातील ६१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या अजय कापडे याने साताऱ्याच्या गोरख कोळेकरचा १०-० असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य लढतीत पुण्याच्या अमोल वालगुडे याने पुणे शहराच्या अमित कुळालचा ११-० अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
त्याचप्रमाणे माती विभागातील ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत बीडच्या अविनाश शिंदे याने सोलापूरच्या प्रणव हांडेचा १२-२ अशा फरकाने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरी उपांत्य लढत सोलापूरच्या बिरुदेव बनसोडे आणि पुण्याच्या अनिल कचरे यांच्यात रंगली. अत्यंत चुरशीची ही लढत सुरू असतानाच दुसऱ्या फेरीत अनिल कचरेच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला लढतीतून माघार घ्यावी लागली आणि बिरुदेव बनसोडे याचा अंतिम फेरीचा मार्ग सुकर झाला.
गादी विभागातील ६१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या विवेक धावडे याने धुळ्याच्या महेश चौधरीचा १०-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या लढतीत कोल्हापूर शहराच्या वैभव पाटील याने पुण्याच्या वेंकटेश देशमुखचा ११-० अशा एकतर्फी फरकाने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. या दोन्ही मल्लांनी आपापली पदकेही निश्चित केली आहेत.
गादी विभागातील ६१ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या विवेक धावडे याने धुळ्याच्या महेश चौधरीचा १०-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या लढतीत कोल्हापूर शहराच्या वैभव पाटील याने पुण्याच्या वेंकटेश देशमुखचा ११-० अशा एकतर्फी फरकाने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. या दोन्ही मल्लांनी आपापली पदकेही निश्चित केली आहेत.
गादी विभागातील ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत सोलापूरच्या विकास कार्ये याने कोल्हापूरच्या नितीन चव्हाणवर मात करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. दुसऱ्या उपांत्य लढतीत ठाण्याच्या सुरज माने याने सोलापूरच्या गोपीनाथ सुतारचा ८-४ अशा गुणाधिक्याने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.
आजच्या उपांत्य फेरीतील निकालांमुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील अंतिम लढती अधिक रंगतदार होणार असून विविध जिल्ह्यांतील आघाडीचे मल्ल विजेतेपदासाठी सज्ज झाले आहेत.


