Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंघ मातीतला, म्हणून रुजला; मार्क्सवाद कालबाह्य झाल्याने संपला' ज्येष्ठ पत्रकार भाऊ...

संघ मातीतला, म्हणून रुजला; मार्क्सवाद कालबाह्य झाल्याने संपला’ ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर; ‘मला उमगलेला संघ’ पुस्तकाचे प्रकाशन

 

 

पुणे, दिनांक १८ एप्रिल २०२६: “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा या मातीतील असून तो उपजत आहे. या उलट मार्क्सवादी विचार हा आयात केलेला आहे. म्हणूनच कालबाह्य झालेला मार्क्सवाद आज संपला असून, संघाचा विचार मात्र जनमानसात खोलवर रुजला आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले.

 

टिळक रस्त्यावरील लेडी रमाबाई सभागृहात आयोजित ‘मला उमगलेला संघ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संगीतकार राहुल रानडे, प्रसिद्ध अभिनेते ऋषिकेश जोशी, पुस्तकाचे संपादक सुधीर जोगळेकर आणि ‘भारतीय विचार साधना’ (भाविसा) संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार भगवान दातार यांनी तोरसेकर यांच्याशी संवाद साधला.

 

संघाने १०० वर्षे पूर्ण केली असताना कम्युनिस्ट चळवळ का लयाला गेली, याचा उलगडा करताना तोरसेकर म्हणाले, “कम्युनिस्टांना आता भारताची मातीही मान्य नाही. सुरुवातीच्या काळात काही नेत्यांनी प्रयत्न केले, मात्र आता ही संपूर्ण चळवळ केवळ ‘पुस्तकी’ राहिली आहे. या उलट संघ स्वयंसेवक समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्रिय आहे. संघ केवळ ज्ञानी लोक घडवत नाही, तर समाजासाठी उपयुक्त ठरणारे लोकसंग्राहक स्वयंसेवक निर्माण करतो.”

 

ऋषिकेश जोशी म्हणाले, “नाट्यकलेचा अभ्यास करताना २० वर्षे मी डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली होतो. मात्र, जगभरातील संस्कृती नष्ट होत असताना भारताची संस्कृती का टिकली, याचा अभ्यास केल्यावर संघ कार्यामागील बलस्थाने लक्षात आली. राष्ट्रभक्तीचा समान धागा मला संघाकडे आकर्षित करणारा ठरला.” राहुल रानडे, “संघाच्या शिस्तप्रियतेमुळेच ही संघटना १०० वर्षे टिकली आहे. संघ प्रार्थनेचे लंडनच्या ‘रॉयल ऑर्केस्ट्रा’मध्ये ५७ वादकांसह ध्वनिमुद्रण करणे, हा एक प्रकारे ‘काव्यगत न्याय’ आहे.” अ‍ॅड. क्षितीज गायकवाड: “बौद्ध समाजात जन्म झाल्यामुळे सुरुवातीला संघाविषयी मनात चुकीची मते होती, मात्र गिरीश प्रभुणे यांच्या सानिध्यात आल्यावर खरा संघ उमजला.” ‘भारतीय विचार साधना’ संस्थेने आतापर्यंत ६०० पुस्तकांचे प्रकाशन केले असून, समाजातील मान्यवरांची संघाविषयीची मते संकलित करण्याच्या उद्देशातून ‘मला उमगलेला संघ’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आल्याचे संपादक सुधीर जोगळेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीश आफळे यांनी केले, सूत्रसंचालन दीपक जेवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण कात्रे यांनी मानले.

—–

– तर फुले-शाहू-आंबेडकर संघाच्या बाजूने…

यावेळी तोरसेकर यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, “महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर वंचितांसाठी लढा दिला. ते कधीही ‘डावे’ नव्हते. ते आज हयात असते, तर नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठीशी उभे राहिले असते. दुर्दैवाने आजच्या चळवळीतील लोकांनी या महापुरुषांना नीट वाचलेले नाही.”

————–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments