पुणे : श्रावण शुद्ध चतुर्थी अर्थात विनायकी चतुर्थीनिमित्त पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात झालेल्या लक्ष दुर्वा गणेशयागाने मंदिर परिसर वेदमंत्रांच्या घोषाने दुमदुमून गेला. श्री जयती गजाननाच्या मूळ मूर्तीसमोर करण्यात आलेल्या या यागात एक लाख दुर्वांचे हवन करण्यात आले. यज्ञकुंडातून दरवळणारा धूप, वेदमंत्रांचा अखंड घोष आणि भक्तांच्या उपस्थितीत झालेली पूर्णाहुती व महाआरती यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार, खजिनदार हेरंब ठकार, विश्वस्त संगीता ठकार, स्वानंद ठकार, आशापूरक ठकार, मिहीर ठकार, मंदार ठकार, तेजस ठकार, हर्षद ठकार आदी यावेळी उपस्थित होते.
मंदिरात यानिमित्त मंत्रजागराचे आयोजन करण्यात आले होते. गणेशयागाच्या यागविधीनंतर पूर्णाहुती आणि महाआरतीने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी गणेशभक्तांनी श्री जयती गजाननाच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेतले तसेच यागादरम्यान झालेल्या मंत्रोच्चाराचे श्रवण केले.
विनायक ठकार म्हणाले, श्री गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुःख आणि अनिष्टतेचा नाश करणारी म्हणून दुर्वेचे महत्त्व सांगितले जाते. दुर्वेच्या उत्पत्तीच्या कथा श्री गणेश पुराण तसेच श्री मुद्गल पुराणात आढळतात. दुर्वेची महती सांगणारे दुर्वा स्तोत्रही मुद्गल पुराणात उपलब्ध आहे. पार्वती देवीने भाद्रपद शुद्ध चतुर्थीपर्यंत केलेल्या श्री गणेश पार्थिव पूजाविधीची सुरुवात श्रावण शुद्ध चतुर्थीपासून केल्याचे संदर्भ आढळतात. या पार्श्वभूमीवर विनायकी चतुर्थीचे औचित्य साधून लक्ष दुर्वा गणेशयागाचे आयोजन करण्यात आले होते.


