पुणे, १ एप्रिल २०२४ : ‘जागतिक मूत्रपिंड आरोग्य महिना’ निमित्त नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटर तर्फे शनिवारी मूत्रपिंड आरोग्याविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात मूत्रपिंडाचे आजार, लक्षणे, निदान आणि उपचार, मूत्रपिंडाच्या आरोग्यासाठी पोषण आणि आहार, फिजिओथेरपी आणि पुनर्वसन आणि मानसिक आरोग्य याविषयी माहिती देणारे सत्र समाविष्ट होते. नोबल हॉस्पिटल मधील नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ.अविनाश इग्नेशियस, नेफ्रोलॉजिस्ट डॉ. राकेश शिंदे, पोषण आणि आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. सारिका सातव, फिजिओथेरपी आणि रिहाबिलिटेशन विभागाचे प्रमुख डॉ.भूपेंद्र गुप्ता व मानसशास्त्रज्ञ नोबल हॉस्पिटलमधील मानसिक आरोग्य विभागातील आर्ट थेरपिस्ट डॉ. शीतल हरपळे यांनी संवादात्मक सत्रात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध आरजे बंड्या होते.
डॉ.अविनाश इग्नेशियस म्हणाले की,बहुतांश वेळा मुत्रपिंडावरचा ताण हा अनियंत्रित उच्च रक्तदाब व मधुमेहामुळे वाढतो.मात्र याशिवाय संसर्ग आणि बैठ्या जीवनशैलीमुळे निर्माण होणार्या समस्यांवर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सतत घेत असलेल्या औषधांमुळे देखील वाढू शकतो. बरेच वेळा पुढील टप्प्यापर्यंत मुत्रपिंडाची लक्षणे दिसूनच येत नाहीत. रात्री सतत लघवीला जावे लागणे,लघवीमध्ये प्रथिनांचे प्रमाण दिसणे यासारखी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.लवकर निदान झाल्यास मुत्रपिंडांवरचा ताण कमी करून त्यांचे कार्य स्थिस्थावर करण्यास मदत होते.रक्तदाब व मधुमेह नियंत्रणाबरोबरच वजन आटोक्यात ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.म्हणूनच आहार आणि पोषण याची देखील भूमिका आहे.
डॉ.सारिका सातव यांनी पाणी आणि मीठाचे आपल्या आहारातील महत्त्व याबाबत सांगितले. त्या म्हणाल्या की, समतोल आहार हा महत्त्वाचा आहे.एकाच प्रकारचा आहार घेतल्यास इतर पोषण घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते.मुत्रपिंडाचा आजाराचा टप्पा,शरीराच्या गरजा आणि रूग्णाचे एकंदर आरोग्य यावर आहाराचा सल्ला दिला जातो.
डॉ.भूपेंद्र गुप्ता म्हणाले की,फिजिओथेरपीचा संबंध नेहमी हाडांच्या आरोग्याशी लावला जातो.मात्र मुत्रपिंडाचे आजार असलेल्या रूग्णांच्या पुर्नवसनात देखील याची महत्त्वाची भूमिका असते.मुत्रपिंडाचे आजार झाल्यावर वेदनांमुळे रूग्णांच्या शारीरिक हालचाली कमी होतात,ज्यामुळे सांध्यांची हालचाल कमी होते व स्नायू कमकुवत होतात.अशा रूग्णांना असलेल्या इतर सहव्याधी देखील अनियंत्रित होऊ शकतात.अशा वेळी फिजिओथेरपी आणि पुर्नवसनाची महत्त्वाची भूमिका असते.शारीरिक तंदूरूस्ती अनेक स्थितींपासून सुरक्षित ठेऊ शकते आणि जीवनमान उंचावण्यास मदत करते.
डॉ. शीतल हरपळे म्हणाल्या की, अनेक आजारांमध्ये ताण हा जोखीमकारक घटक असतो.आपण आपले नातेवाईक,मित्र किंवा समुपदेशकांशी संवाद साधून आपले मन मोकळे करणे गरजेचे आहे.
डॉ.राकेश शिंदे यांनी देखील या सत्रात सहभागी होऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलताना नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिलीप माने म्हणाले की,चांगल्या व सुधारित वैद्यकीय परिणामांमुळे कंझर्व्हेटिव्ह किडनी मॅनेजमेंट प्रोग्राम हा पर्याय वैद्यकीय समुदायामध्ये लोकप्रिय होत आहे आणि म्हणूनच नोबल हॉस्पिटल्समध्ये आम्ही या क्षेत्रातील सर्वात प्रगत देखभाल सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.


