पुणे : समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाची समान संधी मिळावी आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव अधिक व्यापक व्हावी, या उद्देशाने शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाच्या वतीने तृतीयपंथीय समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सात तृतीयपंथीयांची धान्यतुला व सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. गणरायाच्या साक्षीने झालेल्या या उपक्रमातून जमा झालेले धान्य अनाथाश्रमाला भेट देण्यात आले.
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ चौकात झालेल्या या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ महाडिक, शिरीष मोहिते, रोहन जाधव, ॲड. हेमंत झंजाड, अमर लांडे, सचिन ससाणे, नमन कांबळे, सिद्धार्थ पायगुडे, विक्रांत मोहिते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात मंगलमुखी चॅरिटेबल ट्रस्टच्या रंजीता नायक, श्री याल्ल देवदासी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब कुंभार, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या बी. पन्ना, कादंबरी शेख, डॉ. मिलिंद लबाडे, ऐश्वर्या पांडव, किरण वाघ या तृतीय पंथीयांचा सन्मान करण्यात आला. उपरणे, सन्मानपत्र, श्रीफळ असे सन्मानाचे स्वरूप होते.
डॉ. पराग काळकर म्हणाले, प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे. विद्यापीठात प्रत्येकाला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. म्हणून तृतीयपंथीयांकडून कोणतीही फी न घेता त्यांना शिक्षण दिले जाते. अशा उपक्रमांमधून समाजातील सर्व घटकांना आनंद मिळतो. त्यामुळे अशा उपक्रमांमध्ये संपूर्ण समाजाने सहभागी व्हायला हवे.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ आदर्श विचार आणि आचारावर चाललेले आहे. गरजूंसाठी मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. समाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या तृतीयपंथीयांच्या सहभागाने गणरायाच्या साक्षीने ही धान्यतुला होत आहे. या धान्याचे संस्थांना दान केले जात असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व आहे.
कादंबरी शेख म्हणाल्या, आमचे अहोभाग्य आहे की, तृतीयपंथीय समाजाला सन्मान, समान संधी आणि समाजात एकोपा निर्माण व्हावा, यासाठी मंडळाच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. अन्नदान हे श्रेष्ठ दान असून, त्याच्या माध्यमातून मंडळ समाजाची सेवा करत आहे.
शिरीष मोहिते म्हणाले, सेवा मित्र मंडळाच्या वतीने मागील पंधरा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत सामाजिक कार्य केलेल्या मान्यवरांची धान्यतुला करून ते धान्य विविध संस्थांना भेट म्हणून देण्यात आले आहे. यंदा तृतीयपंथीय समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सात तृतीयपंथीयांची धान्यतुला व सन्मान करण्यात आला असून, जमा झालेले धान्य अनाथाश्रमाला देण्यात येणार आहे. उपेक्षित घटकांची सेवा हीच गणेशाची सेवा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


