*’लोकसंवाद २०२६’च्या कार्यक्रमातून गणेश उत्सवात रक्तदानाबाबत जनजागृती*
पुणे, दि. २० :- रक्तदान हे एक अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ दान मानले जाते. एका व्यक्तीने केलेले रक्तदान किमान तीन लोकांचे प्राण वाचवू शकते. रक्तदान केल्याने केवळ गरजू रुग्णालाच जीवदान मिळत नाही, तर रक्तदान करणाऱ्या दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन डॉ.विद्या राठोड यांनी केले.
माहिती व जनसंपर्क विभागांतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात श्री अष्टविनायक मित्र मंडळ, माजी सैनिक नगर येरवडा,येथे ब्लड बँकेच्या डॉ. विद्या राठोड यांनी रक्तदानाबाबतचे महत्व सांगितले.
डॉ. राठोड पुढे म्हणाल्या, शरीरात लोहाचे प्रमाण जास्त झाल्याने ह्दयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो. नियमित रक्तदान केल्यामुळे शरिरातील अतिरिक्त लोह बाहेर पडते आणि रक्ताची जाडी कमी होऊन ह्दयाचे आरोग्य उत्तम राहाते. तसेच रक्तदान केल्यानंतर शरीरात बाहेर गेलेले रक्त भरुन काढण्यासाठी शरीर लगेच कार्यरत होते. यामुळे अस्थिमज्जेला उत्तेजना मिळते आणि शरीरात नवीन, निरोगी लाल रक्तपेशी तयार होतात.
रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टरांकडून दात्याची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये हिमोग्लोबिनची पातळी, रक्तदाब, नाडीचा वेग आणि वजन तपासले जाते. तसेच रक्ताची एचआयव्ही, हिपॅटायटीस आणि मलेरिया सारख्या आजारांसाठी मोफत चाचणी केली जाते. ज्यामुळे आरोग्याची स्थिती समजते. शरीरात लोहाचे प्रमाण नियंत्रित राहिल्यामुळे लिव्हर फुफ्फुस आणि कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होते.
डॉक्टर राठोड यांनी रक्तदानाचे हे दुहेरी महत्व सांगून या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्याचे आवाहनही केले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओमकार ढाणे, उपाध्यक्ष ओमकार नायर, कार्याध्यक्ष पियुष गायचोर, इतर सदस्य व नागरिक उपस्थित होते.
0000


