काश्मिर मधील पहेलगाम या ठिकाणी काल दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध आज
सानपाडा जेष्ठ नागरिक संघाने
केला आहे.या वेळी या हल्ल्यात मरण पावलेल्या सर्व पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या संघाचे सदस्य , काश्मिर मध्ये सेवा बजावलेले आणि दहशतवाद्यांशी लढताना उजव्या हाताची दोन बोटे गमावलेले भारतीय सेनेतील निवृत्त हवालदार श्री संजय पवार यांनी यावेळी भारतीय जवानांना काश्मिर मध्ये कशा परिस्थितीत सेवा बजवावी लागते,हे स्वानुभव विषद करून आपण आमने सामने युद्ध केल्यास कधीच जिंकू शकणार नाही,याची पूर्ण कल्पना असल्यानेच पाकिस्तान असे भ्याड हल्ले करीत असतो,असे सांगितले.
संघाचे उपाध्यक्ष श्री विठ्ठलराव गव्हाणे या वेळी बोलताना म्हणाले की,काल टिव्ही वर पहेलगाम ची परिस्थिती पाहताना अंगावर भीतीने शहारे आले,कारण बरोबर दोन वर्षांपूर्वी आम्ही काही मंडळी नेमके त्याच जागी होतो,याची राहून राहून आठवण येत होती.
संघाचे खजिनदार
श्री व्हि जी मुखेकर यांनी ते पोस्ट खात्यात असताना काश्मिर मधील सहलीत, अमरावती येथील जवान भेटल्यावर त्याच्याशी झालेला संवाद कथन करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले जवान,आपले रक्षण करीत असतात,याची आपण सदैव जाणीव ठेवली पाहिजे,असे आवाहन केले.
संघाचे.अध्यक्ष श्री मा ना कदम
यावेळी बोलताना म्हणाले की,देश विदेशातील पर्यटक घाबरून जाऊन काश्मीर मध्ये येऊ नये म्हणून दहशवाद्यांनी हा हल्ला केला आहे. पण आपण त्यांचा हा डाव उलटवून लावण्यासाठी , न भिता अधिकाधिक संख्येने काश्मिर मध्ये जात रहाणे आवश्यक आहे.
यावेळी अत्यंत त्वेषाने देण्यात आलेल्या देशभक्ती पर घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता.


