मुंबई, दि. ६: सातारा जिल्ह्यातील मायणी (ता. खटाव) येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील वडील सुभेदार रामजी आंबेडकर ब्रिटिशकालीन मायणी धरणाच्या बांधकामावेळी देखरेखीसाठी होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळण्यासाठी या ठिकाणी प्रशस्त स्मारकाच्या निर्मितीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश सामाजिक रज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
बैठकीस माजी आमदार दिलीप येळगावकर, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव सोना बागुल, समाज कल्याण आयुक्तालयाचे सहाय्यक आयुक्त शितल सोनटक्के, सातारा सहायक आयुक्त सुनील जाधव उपस्थित होते, तर ऑनलाइन पद्धतीने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बैठकीत सहभाग घेतला.
राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या, हे स्मारक पूर्णत्वास आल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर यांचे पहिलेच स्मारक असेल. या स्मारकासाठी जलसंपदा विभागाकडील जमीन ताब्यात घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव सादर करावा. या जमिनीच्या भाडे तत्त्वावर घेण्याबाबत तपासणी करावी. चांगल्या वास्तु विषारद कडून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात यावा.
स्मारकाची देखभाल दुरुस्ती जवळील स्थानिक स्वराज्य संस्थेची असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतचे ठराव घेण्यात यावा. सर्व नियमानुसार बाबी पूर्ण करून प्रस्ताव सादर करावा, अशा सूचनाही राज्यमंत्री यांनी दिल्या.


