पुणे, दि. 16 (जिमाका वृत्तसेवा) : खरीप हंगामानंतर पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांची मागणी वाढते. या वाढत्या मागणीचा फायदा घेऊन काही कृषी सेवा केंद्र चालक तसेच खत कंपन्या शेतकऱ्यांना मागणी असलेले खत देताना त्यासोबत इतर खत किंवा औषध घेण्याची सक्ती करीत असल्याचे तक्रारींवरून निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अनावश्यक आर्थिक भार पडत आहे.
या संदर्भातील तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी पुणे विभागातील शेतकऱ्यांनी खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा – पुणे : 9225955955, अहमदनगर : 7588556279 व सोलापूर : 7219286928. प्राप्त तक्रारींची गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांमार्फत शहानिशा करण्यात येईल. दोषी आढळून आलेल्या घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांविरुद्ध खत नियंत्रण आदेश, 1985 नुसार परवाना निलंबन किंवा रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 चे कलम 3 अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाहीही केली जाईल.
निविष्ठा विक्री करताना शेतकऱ्यांना इतर निविष्ठा घेण्याची सक्ती करू नये, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग, पुणे श्री. दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


